प्रतिनिधी/ सातारा
पाचगणी व भिलार येथे सुरू असलेल्या ज्येष्ठांच्या 20-20 क्रिकेट स्पर्धेत सातारा, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर या संघांनी साखळीतील सामने जिंकून विजयी आगेकूच सुरू ठेवली, सातारचे प्रशांत शहा, कोल्हापूरचे अविनाश रायकर, सोलापूरचे प्रदीप कांबळे, नांदेडचे शेख सरदार सामनावीर ठरले.
संजीवन हायस्कुलच्या मैदानावर कर्णधार आर. जाधव यांचे दमदार अर्धशतक व प्रशांत शहा यांनी 4 धावात 5 बळी अशी जादुई कामगिरी करून सातारला नागपूरवर सनसनीत विजय मिळवून दिला. जाधवने 45 चेंडूत 6 चौकारांसह 52, प्रकाश कुंभारने 25 धावा केल्या. संदीप टोकेकरने 13 धावात 3, मकरंद कुलकर्णीने 20 धावात 2 बळी घेवून सातारा संघाला 120 धावावर रोखले. नंतर मात्र, प्रशांत शहाने 3.1 षटकात 4 धावात 5 फलंदाजांना फिरकीच्या जाळय़ात अडकवले. प्रकाश कुंभारने 2, इर्शाद बागवान, प्रमोद जाधवने प्रत्येकी 1 बळी घेत नागपूरचा डाव 83 धावात गुंडाळून संघाला 37 धावांनी विजय मिळवून दिला.
दुसऱया सामन्यात कोल्हापूरने लातूर संघावर 5 विकेटसनी मात केली. कर्णधार जी. श्रीकांत यांनी 2 षटकारांसह 39 धावा केल्याने लातूरला 20 षटकात 125 धावा करता आल्या. कोल्हापूरच्या अमोल भोजनेने 15 धावात 3, अविनाश रायकरने 21 धावात 2 बळी घेतले. रायकर 27, सचिन उपाध्ये 26, नितीन सावर्डेकर 26 यांनी कोल्हापूरला विजयी केले.
भिलारच्या मैदानावर सोलापूरने गोवा संघाला पराभूत केले. गोवा संघाने 20 षटकात 149 धावा केल्या. अभिजीत कदमने 18 चेंडूत 36 दाऊद सय्यदने 38 चेंडूत 44, प्रदीप दाभोलकर यांनी 18 चेंडूत 3 बळी घेतले. सामानावीर प्रदीप कांबळेने 9 फलदाजांचे झेल घेत 1 यष्टीचित केले. नंतर 30 चेंडूत 6 षटकर, 5 चौकारांसह 60 धावा फटकावून सोलापूरला 7 विकेटसने विजय मिळवून दिला. संगमनाथ नागोरी 39, हरीबा कुलकर्णी यांनी 35 धावा केल्या.
नांदेडने औरंगाबादला 95 धावांनी हरवले.
नांदेडने 20 षटकात 3 बाद 239 धावा केल्या. शेख सरदार यांनी 32 चेंडूत 9 षटकार 5 चौकारांसह 82, पंकज सोनीने 53, भरत चव्हाणने 20 चेंडूत 42 धावा केल्या. सुनील भावेने 21 धावात 2 बळी घेतले. औरंगाबादचा डाव 143 धावांवर संपला. संजय जाधवने 37, विजय अडोलकरने 27 धावा केल्या. महमंद फहीमने 20 धावात 4 अनिल बांदेकरने 16 धावात 2 बळी घेतले.