गोडोली / प्रतिनिधी :
हद्दवाढीमुळे सातारा शहरात समावेश झालेल्या विलासपूर मधील काही भागात नगरपालिकेकडून कचरा उचलणी होत नाही. त्यामुळे राधिकानगर फॉरेस्ट कॉलनी, गणेशनगरमधील काही दिवस कचरा न उचलल्याने दुर्गंधी पसरु लागली होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, बाळासाहेब पिसाळ, आबा शिंदे यांनी थेट मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे पाठपुरावा केला. बापट यांनी तात्काळ कचरा उचल्याचे आदेश देऊन स्वच्छता करून घेतल्याबद्दल कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कामाच्या धडाक्याचे कौतुक केले.
सातारा शहरांमध्ये नव्याने सामाविष्ट झालेल्या विलासपूर ग्रामपंचायत हद्दीतील गणेश नगर फॉरेस्ट कॉलनी, राधिका नगर भागांमध्ये गेली चार दिवस कचरा गाडी व्यवस्था विस्कळीत झाली होती. नागरिकांच्या मध्ये चांगलाच असंतोष वाढला होता. दुर्गंधी पसरु लागली असून, घाणीचे साम्राज्य वाढू नये, यासाठी स्थानिक नागरिकांनी फिरोज पठाण, बाळासाहेब पिसाळ, आबा शिंदे यांच्या निदर्शनास हि बाब आणली. त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे कामाचा पाठपुरावा केला. हद्दवाढीनंतर नागरिकांना मुलभूत सोईसुविधा मिळवण्यासाठी फिरोज पठाण, माजी सरपंच बाळासाहेब पिसाळ, माजी उपसरपंच अभय जगताप, जेष्ठसमाज सेवक आबा शिंदे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत.