जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष, कोरोना पॉझिटिव्ह रेट वाढतोय,
सोमवारपासून विना मास्क, सोशल डिस्टन्सवर होणार कडक कारवाई
प्रतिनिधी / सातारा
देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह येवून कोरोनाच्या अनुषंगाने आवाहन केले आहे. त्यानुसार राज्यात दोन जिल्ह्यात लॉकडाऊन झाला आहे. सातारा जिह्यात कोरोनाची अवस्था भयानक आहे. पुन्हा कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून स्वयंशिस्त की अशंतः लॉकडाऊन हे सातारा जिल्हावासियांनीच ठरवले पाहिजे. नियम पाळले तर लॉकडाऊनची गरज लागणार नाही. दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सातारा जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट वाढत आहे.
सातारा जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 35 लाख एवढी आहे. जिह्यात आजपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात 3 लाख 37 हजार 859 एवढ्या जणांची आजपर्यंत तपासणी झाली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या झालेल्या तपासणी तशा नगण्य आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लोकभावनेचा विचार करुन लॉकडाऊन शिथील केले. लॉकडाऊनमध्ये शिथीलपणा आणला असला तरीही नागरिकांना स्वयंभान हरवले गेले आहे. नागरिक स्वतःमधील सवयी विसरु लागलेले आहेत. गेले वर्षभर कोरोनाच्या नियमामुळे मास्क, सोशल डिस्टन्स, हात धुवा याचा वैताग आलेला आहे. नियम नियम एकदाचेच काय होईल ते होईल म्हणून नागरिकही मास्क खिशात टाकूनच फिरताना दिसत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु आहे, परंतु जिह्यात एसटी असेल वा इतर खासगी वाहतूक असेल नागरिक खुले आम प्रवास करताना दिसत आहेत. गर्दी आताशी कुठे होवू लागली आहे. कोरोनाच्या धास्ती आता कुठेही दिसत नाही. कोरोनाबाधितांची संख्या ही 100 च्या आतमध्येच असून दररोज मृत्यूदर जरी शुन्यावर असला तरीही बाधितांचा आकडा हा इतर देशाच्या तुलनेने सातारा जिह्याची परिस्थी खूप भयानक आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या विरोधातील लसीकरण आले असले तरीही त्या लसीकरणामुळे आणखी बेफिकीरी वाढली आहे. जे कोरोनो योद्धे, सर्वसामान्य नागरिकांना कोरोना विरोधातील लस दिली जात नसल्याने तीव्र नाराजी आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा हा 57 हजार 936 वर पोहचला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने अंशतः लॉकडाऊन करण्याच्याबाबत निर्णय घेणार की नागरिकांनीच स्वयंशिस्त नागरिकांना पाळावी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
झोपी गेलेले प्रशासन होतेय जागे
अनलॉक झाले तरीही अजून नियम बंधने कायम आहेत. त्यामुळे नागरिक लॉकडाऊनला वैतागले आहेत. कोरोना काही व्हायचा तो होवू द्या. मरण एकदाचे येईल म्हणून नागरिक ही बिनधास्तपणे शहर व ग्रामीण भागात फिरतात. प्रशासनही आता झोपेतून उठून जागे होवू लागले आहे. शिवजयंतीला कलम 144 लागू केले आहे. उद्याच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत.