नागठाणे / प्रतिनिधी :
स्वराज्य सेना, साताऱ्याच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चंदननगर(सातारा) येथे हे शिबीर पार पडले. शिबिराचे उद्घाटन स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय वाडकर, माथाडी कामगार नेते व सेनेचे राष्ट्रीय महासचिव संजय निकम (बापू),मुंबई अध्यक्ष सूर्यकांत पोळ व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा जाणवत असून युवकांनी उस्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय येथील रक्तपेढी व महालक्ष्मी ब्लड बैंक यांच्या माध्यमातून या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. शिबिरात ७० जणांनी रक्तदान केले. शिबिरास जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर यांनी भेट दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश राजेमहाडीक, अभिजित निकम, सचिन घाडगे, नितेश माने, विजय कदम, जितेंद्र चव्हाण, सचिन माने, धाराशिव जिल्हा युवा अध्यक्ष विशाल लोमटे, कार्याध्यक्ष राहुल लोमटे आदी उपस्थित होते.