प्रतिनिधी/ सातारा
दोन दिवसांपूर्वी प्रतापसिंहनगरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडणाऱया सातारा पोलिसांनी सातारा शहर, तालुका, शाहूपुरी व औंध परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱया साताऱयातील गुंडांच्या टोळीला एक वर्षासाठी जिल्हय़ातून तडीपार केले आहे. पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धडाकेबाज कारवाईचे जनतेतून अभिनंदन होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर, सातारा तालुका, शाहुपुरी, औंध परिसरात दरोडा, मारामारी, औंध परिसरात खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे तसेच शरीराविरुध्द व मालमत्तेचे अनेक गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. या टोळीचा प्रमुख आकाश संदीप साबळे (वय 23 रा. शिवथर, ता. सातारा), टोळीतील त्याचे साथीदार साहील अय्याज इनामदार (वय 20, रा. केसरकरपेठ सातारा), शाकीर शाकीब बाबा शेख (वय 26, रा. 113 मल्हारपेठ सातारा), तेजस/भाऊ रमेश कदम, वय 26 रा. साईपुष्प अपार्टमेंट, चंदननगर कोडोली, सातारा), रामा शिवाप्पा बनसोडे (वय 33, रा. रविवारपेठ, मार्केट यार्ड सातारा) अशी टोळी तयार झाली होती.
दिवसेंदिवस त्यांचे कारनामे वाढतच चालले होते. त्यांच्याबद्दल वाढत्या तक्रारीमुळे या टोळीतील पाचजणांना हद्दपार करण्यासंदर्भातील प्रस्ताव शाहुपुरी पोलीस ठाण्याकडून हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे सादर करण्यात आला होता. हद्दपार प्रस्तावाची सुनावणी या टोळीतील पाच गुंडांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये सातारा जिल्हा हद्दीतुन 1 वर्षे (एक वर्ष) या कालावधीसाठी हद्दपार केले बाबतचा आदेश अजयकुमार बंसल यांनी बजावला आहे.
टोळीस वेळोवेळी सुधारण्याची संधी देवून त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. जिल्हय़ात हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये यासाठी टोळीतील पाचजणांना हद्दपार करण्याचा आदेश हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केला आहे. आदेशाची बजावणी झाल्यानंतर 48 तासाचे आंत त्यांना सातारा जिल्हा हद्दीबाहेर गेले पाहिजे असाही आदेश केला आहे.
या कामी प्राधिकरणापुढे सरकार पक्षातर्फे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे सातारा जिल्हय़ात समाजामध्ये दहशत पसरविणाऱया गुडांविरुध्द विरुध्द कारवाई करण्याचा इशारा पोलीस दलाने दिला आहे.