डॉ. डी. एच. पवार : सातारा तालुक्यात 1, 397 ऍक्टिव्ह रुग्ण : होम आयसोलेट 498
प्रतिनिधी /सातारा
सातारा शहर व तालुक्यातील वाढती बाधित वाढ कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून कसोशीने प्रयत्न सुरु आहत. मात्र, सध्या त्यात नागरिकांकडूनच बरेच अडथळेही येत आहेत. एकीकडे रुग्णांवर उपचार, लसीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अशा तीन पातळीवर आरोग्य विभाग काम करत आहे. मात्र, होम आयसोलेट रुग्णांकडून नियम पाळण्यात येत नसल्याने स्प्रेड थांबत नाही. त्यामुळे सातारा शहर व तालुक्यातील होम आयसोलेशन बंद करुन बाधित नागरिकांना कोरोना केअर सेंटरमध्ये शिफ्ट करण्याचे काम सुरु असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डी. एच. पवार यांनी सांगितले.
सातारा तालुक्यात एकूण बाधितांची संख्या 50 हजाराला भिडायला निघाली असून सध्या ती 48 हजार 528 झाली आहे. यातील 90 टक्के रुग्ण कोरोनामुक्त झालेले असले तरी सातारा तालुक्यात ज्या पध्दतीने बाधित वाढ होत आहे त्याचे कारण होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण नियम पाळत नसल्याचे आहे. ज्यांना काहीच लक्षणे नाहीत पण कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगमध्ये ते बाधित आलेत. असे रुग्ण होम आयसोलेट होत आहेत. सध्या सातारा तालुक्यात 1 हजार 397 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यापैकी 498 होम आयसोलेट आहेत.
मात्र, घरी थांबल्यानंतर त्यांच्याकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यातील काहीजण बाहेर फिरत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने होय आयसोलेट रुग्णांना कोरोना केअर सेंटर, शाळांमध्ये ठेवण्यास सुरुवात केली. प्रसंगी त्यासाठी पोलीस दलाकडूनही मदत घेण्याची वेळ येत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
दक्षता समित्यांकडून सहकार्य मिळत नाही
गावोगावी कोणी कोरोना बाधित आल्यानंतर त्याच्या अतिसंपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक गेल्यास तिथे नागरिक तपासणी करुन घेण्यास होत नाहीत. उगाच आम्हाला घरात बसवू नका असे सांगत आहे. अशा वेळी दक्षता समिती, लोकप्रतिनिधी, सरपंच यांनी लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भभवत असून सगळा दोष आरोग्य विभागावर मारण्यात येत आहे.
साताऱयात क्वारंटाईन सेंटरची आवश्यकता
सातारा शहरातील वाढत्या संख्येलाही होम आयसोलेट रुग्ण नियम पाळत नसल्याचे कारण आहे. वास्तविक शासनाच्या कोरोना केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा असून तिथे चांगल्या दर्जाच्या जेवण नाष्टय़ासह औषधेही देण्यात येतात. सातारा शहरात देखील अशा प्रकारे एखादे मोठे कार्यालय, मंगल कार्यालयात घेवून होम आयसोलट होणाऱया रुग्णांना त्यांचा कालावधी संपेपर्यंत तिथे ठेवण्याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱयांशी चर्चा झाली असून सातारा शहरात क्वारंटाईन सेंटरची गरज असल्याचे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
पोलिसांची, महसूलची घ्यावी लागतेय मदत
एखाद्या घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करताना ग्रामीण भागात लोक सहकार्य करत नाहीत. अशा वेळी आता पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी यांची मदत घ्यावी लागत आहे. वास्तविक अतिसंपर्कातील लोकांनी टेस्टिंग टाळण्याची गरज नाही. उलट टेस्टिंग करुन स्वतःला सेफ करुन घेतले पाहिजे. मात्र, तसे होत नाही. लोक ऍनलॉक केल्याने बाहेर फिरत आहेत. त्यामुळे सातारा तालुका व शहरात स्प्रेड कमी होण्यास अडथळे येत आहेत.
डुप्लिकेट नोंदणी होत असल्याने आकडा फुगतो अनेक नागरिक हे शासकीय तपासणीत बाधित आल्यानंतर त्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी निगेटिव्हच आहे असे सांगण्याचा त्यांचा आटापिटा असतो. त्यामुळे असे अनेक नागरिक पुन्हा वेगवेगळय़ा ठिकाणी कोरोना टेस्ट करत असल्याने एकाच नावाचे दोन, तीन वेळा डुप्लिकेशन होत असल्याने बाधित वाढीचे आकडे फुगत आहेत. वास्तविक अहवाल बाधित आल्यानंतर नागरिकांनी लक्षणांनुसार हॉस्पिटल किंवा कोरोना केअर सेंटरमध्ये स्वतःला विलगीकरण घेवून धोका कमी केला पाहिजे, असेही मत डॉ. पवार यांनी नोंदवले आहे.