प्रतिनिधी/ सातारा
येथील शाहूपुरी परिसरात असणाऱया अंजली कॉलनीमधील ओढय़ावरील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन पुरामध्ये वाहून गेल्याची घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच शनिवारी सकाळी सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सौ. सीता हादगे, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक शकील बागवान, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंते द्विविजय गाढवे, सुपरवायझर संदीप सावंत यांनी घटनास्थळाला भेट देऊन नवीन पाईपलाईन कार्यान्वित करण्याच्या कामाचा शुभारंभ केला.
मंगळवारी रात्रीपासून सातारा शहर व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग तीन दिवस पावसाने झोडपून काढल्यामुळे शहर, उपनगर आणि तालुक्यात फार मोठे नुकसान झाले. सातारा येथील शाहूपुरी परिसरात असणाऱया अंजली कॉलनीमधील ओढय़ावरील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना शुक्रवारी रात्री उशीरा घडली. त्यामुळे ऐक्य कॉर्नर परिसर, प्रतापगंज पेठ, राधिका टॉकीज परिसर आणि बुधवार नाका परिसरात शनिवारी सकाळी कोटेश्वर टाकी येथून होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. याबाबतची माहिती मिळताच सकाळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे पाणीपुरवठा सभापती सौ. सीता हादगे, नगरसेवक शकील बागवान, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, पाणीपुरवठा अभियंता द्विग्विजय गाढवे, सुपरवायझर संदीप सावंत आणि कर्मचाऱयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी तात्काळ संबंधित पाईपलाईन बाबत चौकशी केली असता ती सातारा येथे उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच सौ. सीता हादगे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून संबंधित पाईप तात्काळ पुणे येथून मागून देण्याच्या सूचना केल्या. शनिवारीच पाईप उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी तात्काळ नवीन पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
नागरिकांनी पाण्याचा वापर उकळून गाळून करावा
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातारा शहरासह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गढूळ पाणी येऊन पाणी फिल्टरेशन प्लांटमध्ये गाळ साचत आहे. अंजली कॉलनीमधील पाईपलाईन वाहून गेल्यामुळे मोकळ्या असलेल्या पाईपमध्ये कचरा व जल सदृश्य कीटक गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऐक्य कॉर्नर परिसर, राधिका रोड, बुधवार नाका परिसरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर उकळून, गाळून करावा. नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर किमान चार दिवस ही काळजी घ्यावी, असे आवाहन सौ. सीता राम हादगे यांनी केले आहे.