कृष्णानगर येथील घटना – दुचाकीस्वार युवक कोडोलीचा रहिवासी
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील सातारा ते कोरेगाव रस्त्यावर असलेल्या कृष्णानगर येथील कण्हेर कालव्यावरील पुलावरील कठडय़ावरुन दुचाकी कालव्यात पडून कोडोलीतील एका युवक ठार झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. वैभव जनार्दन सुतार (वय 32, रा. कोडोली, सातारा) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा-कोरेगाव रस्त्यावर असलेल्या कृष्णानगर येथे कण्हेर कालव्यावर पुल असून मंगळवारी रात्रीच्या वेळी हा अपघात घडला असल्याची शक्यता आहे. सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना पुलाच्या खाली कालव्यात दुचाकी व कोणीतरी खाली पडले असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी ही बाब पोलिसांना कळवल्यानंतर सकाळी 7 च्या दरम्यान शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यावेळी पुलाच्या कठडय़ावरुन दुचाकी खाली कोसळली व तिथे एकजण पडलेला होता. पोलिसांनी पाहणी केली त्यावेळी तो युवक मृत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे असलेली गाडी कोल्हापूर पासिंगची होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला व दुचाकी बाहेर काढून अपघाताचा पंचनामा केला.
गाडीच्या माहितीवरुन युवकाचे नाव समोर आल्यावर तो युवक वैभव सुतार असून तो कोडोलीतील रहिवासी असल्याचे समोर आले. पोलिसांनी नातेवाईकांना याची माहिती दिल्यानंतर या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून या अपघाताचा तपास माहुली दूरक्षेत्राच्या महिला पोलीस कर्मचारी मोरे करत आहेत.
पत्रे असते वाचला असता जीव
कृष्णानगर येथील कण्हेर डाव्या कालव्याच्या या पुलावर बांधकाम विभागाने पत्रे उभे करुन संरक्षक भिंत उभारली होती. मात्र, हे पत्रेही परिसरातील चोरटय़ाने चोरुन नेल्याने तिथे पत्रेच शिल्लक राहिले नाहीत. रात्रीच्या वेळी हे पत्रे असते तर कदाचित त्या युवकाचा जीव वाचला असता. तो युवक कठडय़ाला धडकून खाली पडताना त्याच्या डोक्याला प्राधिकरणाच्या पाईपचा मार लागला असावा. खाली पडल्यानंतर रात्री त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही व त्याला दुर्दैवाने मृत्यूला सामोरे जावे लागले.