प्रतिनिधी/ सातारा
धुक्यात हरवली वाट… सोबतीला वळणावळणाचा घाट.. उरतुनी आले धुके काय… वर्णावा तो सह्याद्रीचा थाट… अशा शब्दात वर्णन करावे तेवढे थोडेच. सकाळी जिह्यात धुक्याची सगळीकडे चादर पसरल्याचे वातावरण झाले होते. त्यामुळे रस्ते, झाडे, डोंगर, गावे, शहरे धुक्यात सकाळी 10 वाजेपर्यंत बुडून गेल्याचे आगळेवेगळे वातावरण दिसत होते. या वातावरणाचा काहींनी मनमुराद आनंद घेतला तर याच वातावरणाचा धोका पिकांना होणार असून किडीचा प्रार्दुभाव सुरु होणार आहे. अजून चार दिवस असेच वातावरण राहिल असा अंदाज हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. सकाळच्या धुक्यामध्ये केवळ सातारा शहर नाही तर संपूर्ण जिह्यात वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे क्षणभर आपण काश्मिरमध्येच आहोत असा भास सातारकरांना आला.
दरवर्षी धुके हे पावसाळय़ात डोंगरमाथ्यावर विशेष करुन महाबळेश्वर, तापोळा परिसरात अनुभवायला मिळते. तर दाट धुक्यात पहुडलेली गावे, शहरे हे चित्र जम्मू काश्मिर, दिल्ली या भागात हिवाळय़ात पहायला मिळते. परंतु शनिवारी सकाळीच जिह्यात वातावरण बदलले. धुक्यात रस्ते हरवले होते. सातारा शहरात तर मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना अनोखा फिल पहायला मिळाला. कुरणेश्वर, चारभिंती, अजिंक्यताऱयावर आणि यवतेश्वर घाटात चालणाऱयांना पुढचे काहीच दिसत नसल्याने ते तेथेच काही काळ थांबून राहिले. महामार्गावरही धुक्यामुळे वाहतुक धिम्यागतीने सुरु होती. सर्वच वाहनचालकांना वाहनाच्या लाईटस लावाव्या लागल्या होत्या. धुक्याची तीव्रता सव्वा दहा वाजेपर्यंत जाणवत होती. दवांचे थेंब धुक्यासोबत पडत थंडीची जाणीव करुन देत होते. त्यामुळे क्षणभर साताऱयात नव्हे तर काश्मिरमध्येच आहोत असा फिल वाटत हेता. या वातावरणाचा मुलांबरोबरच अनेकांनी आनंदही लुटला.
हवामान तज्ञांकडून आणखी चार दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज
असे वातावरण अजून पाच ते सहा दिवस राहणार आहे. त्याचे कारण असे की उत्तर भारत, काश्मिर या भागातून येणाऱया पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव हा आहे. तिकडे सगळे वारे बाष्प घेवून इकडे पोहचतात. सकाळच्या धुक्यात हवेत अंत्यत सुक्ष्म पाण्याचे थेंब असतात. ते हवेत लटकत राहतात. तो कालावधी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यत असतो. ज्यावेळी हवेत आर्दता जास्त असते. याचा पाऊसही होणार असून तो विदर्भात पडण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली जिह्यात पाऊस होणार नाही. परंतु धुके राहणार आहे. सातारा जिह्यात कांदा पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. या पिकासह अनेक पिकांवर या धुक्याचा परिणाम होणार असून पिकांवर करपा तसेच किडीचा प्रादुर्भाव होणार आहे. ज्यांचे असेल त्यांनी काळजी घेतली पाहिजे, औषध मारावे लागले. आले, लसुण, हळदीवर तांबेरा वाढण्याची शक्यता आहे. हवेत सुक्ष्म पाण्याचे कण धुक्यात असल्याने काही जंतूची वाढ मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे भेंडी पिकालाही प्रार्दुभाव होतो. टोमॅटोवर रोग पडू शकतो.