समर्थ मंदिर परिसरात खळबळ : चार संशयितांना दोन तास अटक : मंगळवारी रात्रीची घटना
प्रतिनिधी / सातारा
येथील मंगळवार पेठेतील समर्थ मंदिर परिसर चौकात बजरंग लक्ष्मण गावडे यांचा पूर्ववैमनस्यातून खून झाला. मंगळवार, दि. 15 रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे मंगळवार पेठ आणि समर्थ मंदिर चौक परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकाश बल्लाळ, अमन सय्यद, तुषार धोत्रे, आकाश शिंदे या संशयितांना अटक केली आहे.
मृत बजरंगचे भाऊ शंकर लक्ष्मण गावडे (वय 32, रा. मंगळवार पेठ, सातारा) हे भारतीय लष्करात सेवा बजावत असून ते जम्मू काश्मिरमध्ये कार्यरत आहेत. सुट्टीनिमित्त ते घरी आले आहेत. त्यांनी या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शंकर गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अधिक माहिती अशी, त्यांचे भाऊ बजरंग लक्ष्मण गावडे यांचा पशुपालनाचा व्यवसाय होता. बजरंग आणि संशयित आकाश नितीन बल्लाळ या दोघांमध्ये काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होता. यानंतरही दोघांच्यातील वाद मिटला नव्हता. दरम्यान, मंगळवार, दि. 15 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बजरंग हे मंगळवार पेठेत समर्थ कॉर्नर अपार्टमेंटजवळ जनावरांना चारा टाकण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असतानाच पूर्वीचा राग मनात धरुन आकाश नितीन बल्लाळ, (वय 23, रा. 408, समर्थ मंदीर, मंगळवार पेठ, सातारा), अमन इस्माईल सय्यद, (वय 20, रा. 405, समर्थ मंदीर, मंगळवार पेठ, सातारा), तुषार प्रल्हाद धोत्रे, (वय 21, रा. 439, मंगळवार पेठ, सातारा), आकाश उदयसिंह शिंदे (वय 23, रा. 405, समर्थ मंदीर, मंगळवार पेठ, सातारा) या चौघांनी त्याला अडवले आणि त्यांच्या डोके, हात आणि मानेवर हत्याराने वार केले व चौघेही निघून गेले.
बजरंग यांच्या शरीरावर हत्याराने वार झाल्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात तेथेच खाली पडले. याची माहिती शंकर यांना मिळाल्यानंतर बजरंग यांचे मोठे बंधू शिवाजी, शंकर तसेच शेजारी असणारे अक्षय शेडगे, सुनील मोरे, अशोक कदम, बजरंग यांचा साडू दत्ता आणि त्यांची पत्नी रेश्मा असे घटनास्थळी आले होते. यावेळी त्यांना बजरंग हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यावर, चेहरा, मानेवर हत्याराने गंभीर वार झाले होते. दरम्यान, बजरंग यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच तो घटनास्थळीच मृत झाला असल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेने रात्री सातारा शहर परिसरात खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नानासाहेब कदम, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, घटना घडलेले ठिकाण सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे सातारा शहर पोलीस ठाणे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळाचा पंचानामा करत कुटुंबियांकडून माहिती घेण्याचे काम सुरु केले होते.
या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक फौजदार विश्वास कडव, पोलीस हवालदार अजित जगदाळे, प्रशांत शेवाळे, हवालदार सणस, पोलीस नाईक शिवाजी भिसे, अविनाश चव्हाण, अरुण दगडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घाडगे, अभय साबळे, गणेश भोंग, विशाल धुमाळ सहभागी झाले होते.
चौकट
2017 साली चिकनवरुन झाला होता वाद
खून झालेले बजरंग गावडे आणि आकाश बल्लाळ यांचा 2017 मध्ये वाद झाला होता. तो वाद अजूनही शमला नव्हता. बजरंग गावडे हे चिकनचे तुकडे कुत्र्यांना खायला टाकत होते. मात्र, काही कारणांमुळे आकाश बल्लाळ याला ही बाब खटकली होती. त्यामुळे त्याने बजरंग यांना ‘तू कुत्र्यांना चिकनचे तुकडे टाकत जावू नकोस,’ असे सांगितले होते. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी बल्लाळ याने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बजरंग यांच्यावर गुन्हा दाखल होवून त्यांना अटकही झाली होती. मात्र, 2017 मध्ये झालेल्या मारहाणीचा राग बल्लाळ अजूनही विसरला नव्हता. त्या रागाच्या भरातच त्याने बजरंगवर हल्ला करुन त्याचा खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चौकट पान 1 वर घेणे
दोन तासांत संशयितांना अटक
सातारा येथील मंगळवार पेठेतील बजरंग गावडे यांच्या खूनाचा छडा सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या दोन तासांत उघडकीस आणला असून याप्रकरणी चारजणांना अटक केली. पोलिसांना ज्यावेळी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी हा खून कोणी केला याची माहिती घेण्याचे काम सुरू होते. तक्रार अर्ज आणि मिळालेली माहिती लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला होता. हा खून करून संशयित पळून गेले होते. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना सातारा शहरातील काही भागातून चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी बजरंग गावडे यांचा खून केला असल्याची कबुली दिली.