विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस : बेडस व चाचण्या वाढवाव्या लागतील
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्गाची साताऱयातील स्थिती गंभीर असून बाधित रुग्णवाढीचा दर 22 टक्क्यांवर गेला आहे. काही रुग्णांना बेडस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी असून त्यासाठी 400 बेडसच्या जम्बो हॉस्पिटलसचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले आहे. तो राज्य शासनाने तातडीने मंजूर करण्याची गरज असून त्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात जावून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासमवेत कोरोना परिस्थितीची पहाणी केली. तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासमवेत कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर नगरसेवक धनंजय जांभळे, शहराध्यक्ष विकास गोसावी, विजय काटवटे, राहुल शिवनामे, ऍड.प्रशांत खामकर, अमित कुलकर्णी, सुवर्णा पाटील, डॉ.उत्कर्ष रेपाळ, सचिन पवार उपस्थित होते. दुपारी त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात जावून तिथे पाहणी केली तसेच रुग्णावर करण्यात येणाऱया उपचारासंदर्भातही माहिती घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, साताऱयात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने स्थिती गंभीर होवू लागली आहे. जिल्हय़ात रुग्णांना बेडस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे बेडसची संख्या वाढवण्याची गरज असून त्याबाबत शाहू स्टेडियमवर 400 बेडसचे जम्बो हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या जिल्हय़ात 500 च्या आसपास टेस्ट होत असल्या तरी आरटीपीसी टेस्टची क्षमता वाढवून ती 1000 पर्यंत नेण्याची गरज आहे. तातडीने रुग्ण शोधणे व उपचार करुन ते बरे केल्यास रुग्ण वाढीचा आलेख खाली येवू शकतो.
क्रिटीकल रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडस व व्हेंटीलेटर्सची उपलब्ध होण्याची गरज आहे. शासनाने या स्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घेतला पाहिजे अन्यथा रुग्ण भटकत राहतील. सध्या जिल्हय़ात आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर मोठा ताण आहे. त्यांच्यावर नाराजी व्यक्त करुन उपयोग नाही. त्यांना राज्य शासनाकडून आवश्यक त्या आरोग्य सुविधा तातडीने पुरवल्या गेल्यात. याबाबत राज्य शासन गंभीर नसल्याबाबत छेडले असता फडवणीस म्हणाले, मी राज्य शासनावर काही आरोप करणार नाही. मात्र योग्य संवाद ठेवत त्यांनी राज्यातील परिस्थिती हाताळली पाहिजे.
प्रार्थनास्थळे उगडायला हवीत
संपूर्ण देशात सगळय़ा राज्यात धार्मिक स्थळे उघडली गेली आहेत. मात्र महाराष्ट्रात अद्याप परवानगी दिली नाही. राज्यात मॉल उघडताय, दारुची दुकाने सुरु करताय तर मंदिरात बंदी कशासाठी ? मंदिरे वा धार्मिक स्थळे उघडल्यास ते चालवणारांना काळजी आहेच. ते सर्व काळजी घेतील तसेच लोकांना देखील कोरोनाचे गांभीर्य आहेच. केंद्राने परवानगी दिलेली आहे तर महाराष्ट्रात नेमकी काय अडचण आहे मला कळत नाही, असेही फडवणीस म्हणाले.
जिल्हा रुग्णालयात खासदार शरद पवार यांनी दिलेल्या रेमडेसवीर इंजेक्शन चोरीस गेल्याच्या प्रकाराबाबत छेडले असता त्यांनी जिल्हाधिकाऱयांनी याबाबत चौकशी सुरु केली असून त्याबाबत अहवालानंतर ते कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अलमट्टीची उंची वाढणार नाही
कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राज्यातील या मागच्या सरकारने अलमट्टीची उंचीबाबत आक्षेप घेण्याची गरज होती. मात्र त्यांनी तो घेतला नाही. त्यामुळे आज ही परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांवर येत असून अलमट्टीची उंची वाढणार नाही. त्याला कारण मागचेच सरकार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.