प्रतिनिधी/ सातारा
समर्थ मंदिर परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी जुन्या भांडणाच्या रागाच्या कारणातून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने साताऱयासारख्या शांत शहरात खळबळ उडाली होती. त्यातून सावरत असतानाच शुक्रवारी रात्री पुन्हा समर्थ मंदिरनजिक असलेल्या बोगदा परिसरात यवतेश्वर रस्त्यावर पॉवरहाऊसजवळ बबन हणमंत गोखले या दुकानदाराचा अंडी उधार देण्याच्या किरकोळ कारणातून दगड व धारदार शस्त्राने खून केल्याच्या सलग दुसऱया घटनेने सातारा हादरला. या घटनेमुळे बोगदा परिसरात तणावाचे वातावरण होते.
रात्री खुनाची घटना पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर हा परिसरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तातडीने या खुनाच्या घटनेचा छडा लावण्यासाठी कर्मचारी कामाला लावले. याप्रकरणी पोलिसांनी रात्री 3 वाजता शुभम जयराम कदम (वय 20 रा. पॉवर हाऊस मंगळवार पेठ, सातारा) व सचिन प्रताप माळवे (रा. 446, पॉवर हाऊस, सातारा) या दोघांना अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत मृत बबन गोखले यांच्या पत्नी अलका बबन गोखले (वय 37 रा. 437, मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बबन गोखले यांचे सातारा-कास रस्त्यावर पॉवर हाऊसजवळ स्नॅक्सचे दुकान आहे. दि. 18 रोजी ते दिवसभर दुकानात होते. रात्री सव्वा दहा वाजता दुकान बंद करुन घरी आल्यावर जेवण करण्यास बसत असताना त्यांना कोणाचातरी फोन आल्याने ते गडबडीने त्यांच्या शेजारीच राहणाऱया भाच्याची दुचाकी घेवून पॉवरहाऊसजवळ असलेल्या दुकानाकडे गेले.
रात्री 11 वाजले तरी पती बबन गोखले आले नाहीत त्यामुळे त्यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद लागत होता. रात्री 12.30 वाजताही फोन लागत होता पण ते जेवायला गेले असतील, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली असेल म्हणून त्यांच्या पत्नी झोपी गेल्या. मात्र, रात्री 3 वाजता गोखले यांच्या घरी साध्या वेषातील पोलीस आले. त्यांनी बबन गोखले यांना दोघांनी मारहाण केली आहे. मारहाण करणाऱयांना आम्ही पोलीस ठाण्यात घेवून जात आहे, तुम्ही टेन्शन घेवू नका असे सांगितले. तोपर्यंत गोखले यांच्या नातेवाईकांना बबन गोखले यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिल्याने परिसरासह सर्व गोखले कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता.
अंडी उधार दिली नाही म्हणून खून
यातील आरोपी शुभम कदम व सचिन माळवे हे गोखलेंच्या दुकानावर गेले होते. रात्री 9.45 वाजता त्यांनी अंडी उधार मागितली होती. ती दिली नाहीत म्हणून बबन गोखले यांच्याशी त्यांचा वादही झाला होता. त्यातूनच रात्रीच्या सव्वा दहाच्या सुमारास शुभम कदम याने गोखले यांना मोबाईल करुन तुमच्या दुकानाचे कुलूप उघडे असल्याचे सांगून त्यांना बोलावून घेतले. तिथे आल्यावर शुभम व सचिन माळवे यांनी दगड व धारदार शस्त्राने वार करत गोखले यांचा खून केला.
खून करुन निघाले असतानाच केली अटक
मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधित घटनेच्या अनुषंगाने माहिती आल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हसन तडवी, लैलेश फडतरे, स्वप्नील कुंभार, सचिन माने, सचिन पवार, पंकज मोहिते, मनोहर वाघमळे, भाऊसाहेब तारळे, श्रीनिवास देशमुख, जाधव ही टीम पोहोचली होती. घटनास्थळाचा पंचनामा करत असतानाच खून कोणी केला, नेमके कारण काय याची माहिती घेतली असता त्यांना स्थानिकांकडून आवश्यक ती माहिती मिळाली. त्यानुसार संशयित मारेकऱयांचा शोध सुरु केला ते मंगळवार पेठ परिसरातच चालत घरी निघाले होते. तिथेच त्यांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले.