सदरबझार येथील प्रकार – भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील सर्व नागरिक भाजीपाला खरेदी करत असतात. मात्र, विक्रीसाठी आणण्यात आलेला भाजीपाला कोणत्या पाण्याने धुतला जातोय याचा सदरबझारमधील प्रकार पाहिला तर कोणीही भाजी खरेदी करणार नाही. कारण सदरबझारमध्ये एक विक्रेता कालव्यातील अत्यंत दुषित पाण्याने भाजीपाला धुवून विक्रीसाठी नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
साताऱयात सध्या अनेक भाजी विक्रेते फिरुन भाजी विक्रेते करत असतात. मात्र हा भाजीपाला नेमका स्वच्छ पाण्यात धुवून आणला जातो का याची खात्री करावी लागणार आहे. कारण दूषित पाण्यात भाजीपाल्याची स्वच्छता केली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भाजी विक्रेत्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
सदरबझार येथे कण्हेर डाव्या कालव्याच्या दूषित साठलेल्या पाण्यात एका भाजी विक्रेत्याने भाजीपाल्याची स्वच्छ करत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या कालव्यातील साठलेल्या पाण्याचा वापर नागरिक जनावरे आणि कपडे धुण्यासाठी करत असतात. पाणी साठल्याने पाण्यावर शेवाळे निर्माण होऊन पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्याची पैदास मोठय़ा प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दूषित पाण्यात भाजीपाला धुतल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येणार आहे. या भाजी विक्रेत्यास पालिकेच्या कर्मचाऱयांनी जागेवर जाऊन समज दिली असून त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.