घरगुती गणपतींसह गौरी विसर्जन
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात पाच दिवसाच्या घरगुती गणपतीचे मोठय़ा भक्तिभावाने ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत कृत्रिम तळ्यांसह अनेक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या हौदांमध्ये विसर्जन करण्यात आले. दरम्यान, शहर परिसरात असणाया उपनगरातील नागरिकांनी संगममाहुली, ता. सातारा येथील कृष्णानदी परिसरात सामाजिक अंतर पाळत गणरायाचे विसर्जन करण्यासाठी उपस्थिती लावली. दुसरीकडे गेले तीन दिवस भक्तिभावाने प्रतिस्थापना केलेल्या गौराईना महिलांनी आज भावपूर्ण निरोप दिला.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना साधेपणाने करण्यात आली होती. तर साताऱयात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सार्वजनिक मंडळांनी गणपतींची प्रतिष्ठापना करत प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सातारा नगरपालिकेने शहर परिसरात बुधवार नाका येथील कृत्रित तळय़ासह राजवाडा येथील भवानी तलाव दगडी शाळा आयुर्वेदिक गार्डन आणि हुतात्मा उद्यान येथे उभारलेल्या कृत्रिम तळ्य्वर भक्तांनी गर्दी केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत अत्यंत भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला.
शहरातील उपनगरातील कृष्णानगर, संगमनगर, संभाजीनगर, विलासपूर, धनगरवाडी, कोडोली, गोडोली, औद्योगिक वसाहत, पिरवाडी, गोरखपुर परिसरातील नागरिकांनी संगममाहुली येथील कृष्णा नदीमध्ये सामाजिक अंतर पाळत घरगुती गणरायाचे विसर्जन केले. दुचाकी, चारचाकी, रिक्षा या वाहनांमधून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत भक्तगण संगममाहुली येथे दाखल होत होते. दरम्यान, सातारा शहर व परिसरात तीन दिवसापूर्वी घराघरात प्रतिष्ठापना केलेल्या गौराईना महिलांनी भावपूर्ण निरोप दिला.
गृहराज्यमंत्र्यांनीही दिला भावपूर्ण निरोप
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठापणा केलेल्या गणपतीचे मंगळवारी साताऱयातील पालिकेच्या कृत्रिम तळ्यामध्ये मोठय़ा भक्तिभावाने विसर्जन केले. विसर्जनानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राज्यभरात आज पाच दिवसाच्या गणरायाचे अत्यंत साधेपणाने, कोरोनाचे नियम पाळून नागरिकांनी विसर्जन केले. गणेशोत्सवामध्ये राज्य शासनाने अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यास मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांचे सर्वत्र पालन केले जात आहे. जनतेने मोठय़ा स्वरुपात गणेशोत्सव साजरा न करता, शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.