प्रतिनिधी/ सातारा
शहरातील वाहतूक पोलीसांकडून कागदपत्रे तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. यामुळे वाहनधारकांना त्यांचे काम बाजुला ठेवून वाहतूक पोलीसांच्या तपासणीत तास वाया घालवावा लागत आहे. यामुळे मानसिक त्रास वाढला असून संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिह्यातील तत्कालीन पोलीस अधीक्षक सातपुते यांचा तेजस्वी पायलट प्रोजेक्ट पुन्हा एकदा राबविण्याची मागणी वाहनचालकांमधून होऊ लागली आहे.
सातारा शहरातील पोवईनाका, बसस्थानक, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, राजवाडा, राधिका रोड, देगाव फाटा, मोळाचा ओढा, आजंठा चौक परिसर, वाढेफाटा या परिसरात सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक पोलीस विनाकारण दुचाकी, चारचाकी वाहने अडवित आहेत. वाहनचालकांचा परवाना, पीयूसी, पासिंग संदर्भात कागदपत्रांची मागणी केली जाते. आरसा, इंडिकेटर नसल्यास कारवाईचा बडगा उगारला जातो. या मानसिक त्रासामुळे वाहनधारकांना प्रवास तारेवरची कसरत करायला भाग पाडत आहे. 31 मार्च जवळ येऊ लागल्याने वाहनधारकांना गल्लीतून मार्ग काढावा लागत आहे. वाहतूक पोलीसांकडून वाहनधारकांना आरोपी सारखी वागणूक दिली जात आहे. यामुळे वाहन अडवण्याचा अधिकार पोलीसांना आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाहनधारकांचे कागदपत्र न तपासण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाचे वाहनधारकांकडून स्वागत करण्यात येत हेते. तोच त्यांची बदली सोलापूर ग्रामीण येथे झाली असून हा आदेश त्यांनी तेथील पोलीसांना दिला आहे. मात्र सध्याचे पोलीस अधीक्षक अजय बन्सल हे कोणतीच भूमिका घेत नसल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.