निवडणुका डोळय़ासमोर ठेवून विकासकामांचे फुटू लागले नारळ
प्रतिनिधी/ सातारा
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुमधडाका उडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह हद्दवाढीने आलेल्या पालिकेत समाविष्ठ झालेल्या भागात विकासकामांचे नारळ मोठ्या प्रमाणात फुटू लागले आहेत. तर साविआ अन् नविआतर्फे पत्रक काढून कामांची जंत्री सातारकरांपुढे मांडली जात आहे. दोन्ही राजे पत्रकातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करु लागल्याने हे ‘पत्रक वॉर’ यावेळी नक्कीच धमाका उडवणार असल्याचे चिन्ह आत्तापासूनच दिसू लागले आहे.
सातारा पालिकेत सातारा विकास आघाडी सत्तेत आहे. पण यावेळी त्यांना काहीही करुन साविआला सत्तेपासून रोखायचेच असा चंग बांधून नगरविकास आघाडी कामाला लागली आहे. ठिकठिकाणी विकासकामे करण्याचा त्यांना सपाटा लावला आहे. तर साविआनेही अनेक ठिकाणी निधी टाकून कामे सुरू केली आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली साविआचे नगरसेवक आपण केलेली कामे जनतेसमोर पोहोचवत आहे. तर नगरविकास आघाडीचे प्रमुख आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी तर नगरसेवकांना तर कामाला लागण्याच्या सूचनाच केल्या आहेत.
पालिकेच्या संभाव्य निवडणुका डोळय़ासमोर ठेवून सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीमध्ये लेटर वॉर सुरु झाले आहे. तर नेत्यांचे नारळ फोडण्याचा आणि उद्घाटनांचे कार्यक्रम शहरात सुरु झाले आहेत. त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी एकमेकांविरोधात कुरघोडय़ांचे राजकारण सुरु झाले आहे.
सातारा पालिकेच्या गतवेळीच्या निवडणुकीमध्ये नगरविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून सौ. वेदांतिकाराजे या होत्या तर सातारा विकास आघाडीकडून माधवी कदम या होत्या. त्यावेळी दोन्ही आघाड्यांमध्ये वाद टीपेला पोहोचला होता. त्यावेळी खासदार उदयनराजेंनी एकच नारा ठेवला होता तो म्हणजे सर्वसामान्य महिला म्हणून नगराध्यक्ष असा अजेंडा ठेवला होता तर भाजपाच्यावतीने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या सुवर्णादेवी पाटील या होत्या. अशी तिरंगी निवडणूक झाली होती. सातारा विकास आघाडीची सत्ता आली होती. सातारा विकास आघाडीवर नगरविकास आघाडीकडून आरोप होवू लागले आहेत. तर नगरविकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रराजे यांच्या हस्ते हद्दवाढ झालेल्या भागात विकास कामांचे नारळ ही फुटू लागले आहेत. दुसऱ्या बाजूला सातारा विकास आघाडीकडून पत्रकबाजी सुरु झाली आहे. येवू घातलेल्या पालिका निवडणुकीचे पडघमच सुरु झालेल्या लेटर वॉरवरुन दिसून येत आहे. त्यामध्ये तिसऱ्या पर्यायाला वाव मिळेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून पॅनेल टाकण्याची तयारी सुरु असली तरीही दोन्ही राजेंच्या आघाड्या त्यांना वाव देतील असे चित्र सध्या तर दिसत नाही.
तिसरा पर्याय निर्माण होणार का?
सातारा पालिका निवडणुकीत साविआ अन् नविआ यांच्या पारंपरिक लढती आजवर झाल्या आहेत. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता असल्याने पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने पॅनेल टाकण्याचे अनेकवेळा जाहीर केले आहे. तसेच साविआ आणि नविआचे प्रमुख जरी भाजपात असले तरी साताऱ्यात गतवेळी स्वतंत्र लढलेले भाजपचे पॅनेल यावेळी काय भूमिका घेणार हे उत्सुकतेचे ठरेल. त्यामुळे सातारकरांना तिसरा पर्याय निर्माण होईल की नाही? कोण कोण स्वतंत्र पॅनेल टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.