प्रतिनिधी/ सातारा
सातारा येथे एका वायरमनला मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सातारा येथील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कैलास रवींद्र रावखंडे असे गंभीर जखमी युवकाचे नाव असून तो वायरमन आहे. ही घटना रविवार, दि. 13 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एलबीएस कॉलेजसमोर घडली आहे.
अक्षय गवळी, पूजा रावखंडे तसेच अक्षयचा भाऊ गुड्डू, स्वप्नील (दोघांची नावे माहित नाहीत) (रा. 521, गुरुवार पेठ, एलबीएस कॉलेजजवळ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कैलास रवींद्र रावखंडे, (वय 30, रा. 518, गुरुवार पेठ, एलबीएस कॉलेजजवळ, सातारा) हे वायरमन आहेत. दि. 13 रोजी रात्री त्यांनी संदीप रावखंडे यांना कॉल केला आणि तुमच्या मुलीला व मुलाला समजावून सांगा असे सांगितले. याचा राग मनात धरुन अक्षय गवळी हा कैलास यांच्या घरासमोर आला आणि ‘ये कैल्या, बांडगुळा बाहेर ये. तुला लय मस्ती आली आहे. तुझी मस्तीच बाहेर काढतो,’ अशी धमकी दिली.
यावेळी कैलास हे बाहेर आले असता अक्षय याने त्याच्या हातातील कोयता त्यांच्या डोक्यात डाव्या बाजूला मारला. याचवेळी स्वप्नील याने कैलास यांच्या उजव्या बाजूला बरकडीवर काहीतरी वस्तू मारली. गुड्डू याने हाताने मारहाण केली तर पूजा हिने कैलास यांच्या पाठीवर लाकडी बॅटने मारहाण केली. मारहाण केल्यानंतर अक्षय याने कैलास यांना तू जर पोलिसांत तक्रार दिलीस तर तुल जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
दरम्यान, कैलास यांच्या डोक्यात कोयता मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्यामुळे ते घाबरुन गेले होते. त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांनी चार दिवसांनी गुरुवार, दि. 17 रोजी रात्री आठ वाजता सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अक्षय गवळी, त्याचा भाऊ गुड्डू, स्वप्नील आणि पूजा रावखंडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक दगडे करत आहेत.