प्रतिनिधी/ सातारा :
बुधवारी निसर्ग वादळाच्या धास्तीने नागरिक लॉकडाऊन झाले होते. कोरोनाच्या भीतीचा विसर पडला होता. मात्र जिल्हय़ात एखादा दिवस सोडता दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सातारा शहरात बाजारपेठ सुरु झाली आहे. दुकानदारांनी दुकाने सुरु केल्याने नागरिक देखील खरेदीसाठी बाहेर पडत असले तरी दुकानांमधून होणारी गर्दी धोकादायक आहे. कारण तिथे कोणत्याही प्रकाराची काळजी घेतली जात नाही. सॅनिटाईजरचा वापर केला जात नाही वस्तू खरेदी करताना आवश्यक सोशल डिस्टनसिंग पाळले जात नसल्याचे चित्र सध्या दिसत असून यावर प्रशासनाने रोख लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
दोन महिने कडक लॉकडाऊन पाळलेल्या नागरिकांना लॉकडाऊन अनलॉक करताना बरीच शिथीलता मिळाली आहे. मात्र एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना व काही ठिकाणी संसर्ग साखळय़ा वाढताना आणखी एक महिनातरी लॉकडाऊन आवश्यक असल्याचे सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे शिथीलता मिळाल्याने सातारा शहरातील मुख्य बाजारपेठेतील बंदी असलेली दुकाने वगळता बरीच दुकाने सुरु झाली आहेत.
राजवाडा, मोतीचौक, शनिवार चौकासह राजपथ, पोवईनाका, बसस्थानक परिसरासह उपनगरातील मुख्य चौकातील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु ठेवण्यात येत आहेत. यामध्ये लॉकडाऊनच्या काळात या अत्यावश्यक सेवेतील दुकानांसमोर सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी चौकोनी रकाने आखण्यात आले होते. ते रकाने असले तरी दुकानांसमोर ग्राहकांची होणारी गर्दी सोशल डिस्टन्स पाळण्यात अडथळा ठरत आहेत. यामुळे कोरोनाचे संकट अद्यापही जिल्हय़ात घोंगावत असताना सातारा शहरात उडत असलेल्या सोशल डिस्टन्सचा फज्जा सावरण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.