प्रतिनिधी / सातारा
कोरोना संकटामुळे रोजगार, व्यवसाय थांबल्याने अनेक गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये सामाजिक बांधिलकी जपत इस्कॉन सातारा (भक्तिधाम) यांनी कोंडवे, ता. सातारा येथील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच सातारा परिसरात दररोज ३०० गरजू, असह्य नागरिकांना पौष्टीक अन्नदान केले जात आहे.
कोरोना महामारीने जगात थैमान घातले आहे. त्यामुळे बहुतांश जग लॉकडाऊनच्या गर्तेत अडकले आहे. या बिकट स्थितीमुळे रोजगार, कामधंदे बुडाले आहेत. त्यामुळे लाखो लोकांना उपासमारीचे संकट कोसळले आहे. अन्नधान्यासाठी मदत मागावी लागत आहे. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे संस्थापकाचार्य श्रील भक्तिवेदान्तस्वामी प्रभूपाद यांच्या शिकवणीनुसार येथील इस्कॉलनचे सदस्य दररोज ३०० लोकांना अन्नदान देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे काम देशात, राज्यातही सुरु आहे.
सातारा परिसरातील गरजूंनी ९४२२६०५३१८, ८१४९२३१३६८, ९४२२६०५३१८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.