सातारा / प्रतिनिधी :
देवराई प्रकल्प आणि सातारा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरं वृक्ष संमेलन ऑक्टोबर महिन्यात सातारा येथे होत आहे. पहिलं वृक्ष संमेलन दि.13,14 एप्रिलला झाल होतं. देवराईच्यावतीने गेल्या सहा वर्षापासून झाडं लावण्याचा आणि ती जगवण्याचा उपक्रम राबवला जात आहे. दुसऱ्या वृक्ष संमेलनात युवकांमध्ये झाडांबद्दल प्रेम निर्माण व्हावं यासाठी दहा निसर्ग राजा आणि दहा निसर्ग राणी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच यावर्षी 14 फेब्रुवारीला राधानगरी येथे काटेसावर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, सातारा पोलीस दलाच्या 30 एकर जागेत बायोडायव्हरसिटी प्रकल्प साकारला जात असून, तो सहा महिन्यात पूर्णत्वास येईल, असेही त्यांनी सांगितले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, क्रीडाईचे बाळासाहेब ठक्कर, देवराईचे विजय निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.