अत्यंत संतापजनक प्रकार, जम्बोत उपचार कमी दादागिरीच जास्त, ऐनमहामारीत जिल्ह्याच्या लौकिकाला बट्टा
दीपक प्रभावळकर / सातारा :
इंजेक्शन, ऑक्सिजनविना हजारो रूग्ण जीव सोडत असताना नातेवाईकांचा हंबरडा काळीज पिळवटून टाकत आहे. अशाच वेळी साताऱ्यातील करोडोंचा चुराडा केलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये रूग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना उपचार सोडाच साधा दिलासाही मिळत नसताना कोविड रूग्णांवर दहशतीचा माहोल तयार केला गेलाय. सातारा जिल्हय़ाच्या लौकीकाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सातारकरांचा संयम सुटणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. ज्या व्यवस्थापनाला कचरा उचलायला माणसं मिळत नाहीत त्यांनी नातेवाईकांना उचलून बाहेर काढण्यासाठी तब्बल 16 बाऊर्न्सची फौज तैनात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभ्या राहिलेल्या या इमारतीत होणारा हा निंदनीय प्रकार कोणत्याच पातळीवर खपवून घेतला जाणार नाही, हेच खरं !
कोरोनाच्या महामारीत सध्या महाराष्ट्र होरपळत आहेच तर राज्यात सातारा सातव्या क्रमांकावर गेलाय. 3 हजार 575 पैकी 315 रूग्ण साताऱ्यातल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. याच्या दारात बेडची वाट बघत कित्येक रूग्ण व त्यांचे नातेवाईक रात्रीच्या रात्री ताटकळून काढत आहेत. गेल्याच आठवडय़ात या हॉस्पिटलच्या दारात एकाचा बळी गेला आहे. अनेक पातळय़ांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना हॉस्पिटलच्या प्रशासनाने अत्यंत निच पातळी गाठली असून साताऱ्यात प्रचंड संतापाची लाट उसळणार आहे.
अवघे काही तास मोजत असलेला रूग्ण व त्याच्या नातेवाईकांना दंगेखोर, उर्मट असल्याचे भासवण्यासाठी हॉस्पिटलच्या भोवतीने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सोळा बाऊर्न्स उभे केले जाणार आहेत. शहरातल्या डान्सबारच्या दारावर किंवा कसिनोच्या दारावर उभे राहणारे बाऊर्न्स आणून साताऱयात एक हॉस्पिटल अशी दहशत निर्माण करेल हे कोणाच्याही विचारापलिकडले आहे.
2 डॉक्टर परवडत नाहीत पण 18 बाऊर्न्स कसे?
दारात तडफडणारे रूग्ण व व्याकूळ नातेवाईक यांना किमान आधार देऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी ओपीडी बेसिसवर 2 डॉक्टर्स असावेत, अशी सातारकरांची मागणी होती. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही त्याची दखल घेतली मात्र आणखी 2 डॉक्टर्स परवडत नाहीत म्हणणाऱया प्रशासनाला 16 बाऊर्न्स कसे परवडले?
दवाखान्यांच्या पायऱया झिजवून जम्बोच्या दारात आलेल्या बेड मिळणं दूरच, औषधाची गोळी किंवा आधाराचे दोन शब्द मिळत नव्हतेच आता त्यांनी काय लाथाबुक्या घायची तयारी ठेवायची का?
ना बँकेत, ना सोने दुकानात बाऊर्न्स आहेत
जिल्हय़ातल्या बँकेत, पतपेढीत अथवा सोन्यांच्या मोठय़ा दुकानांतही कधी कोणी बाऊर्न्स पाहिलेले नाहीत. मात्र आज दवाखान्याच्या दारावर पहावे लागण्याची नामुष्की येऊ घातली आहे.
बघू, एससीडी आता तुमच्या आहे हातात
प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर शब्द वाया घालवण्यात काय अर्थ आहे? त्यामुळेच सातारा कोविड डिफेंन्डर म्हणून कार्यरत असलेल्या अस्सल सातारकरांनी याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे.
ही आमची संस्कृती नाही, तातडीने कारवाई करा : पालकमंत्री
मी ‘तरुण भारत’चे आभार मानतो की, त्यांनी तातडीने ही बाब माझ्या लक्षात आणून दिली. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ही साताऱयाची संस्कृती नाही. कोणत्याही परिस्थितीत जम्बो हॉस्पिटलवर बाऊर्न्स चालणार नाहीत. याबाबत मी तातडीच्या सूचना दिल्या असून पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या नातेवाईक प्रचंड ताणात आहेत. त्यांना विश्वासात घेऊन धीर देण्यासाठी आम्ही सदैव झटत असताना हा प्रकार निश्चित संतापजनक आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटिल म्हणाले.
म्हणे,‘सातारा पोलीस कामाचे नाहीत’
साताऱयात पोलीस आहेत ना मग, असं काय घडलं की तुम्हाला साताऱयात बाऊन्सर्स बोलवावे लागलेत? या ‘तरुण भारत’च्या प्रश्नावर ‘सातारा पोलीस कामाचे नाहीत!’ असं प्रशासनाने उत्तर दिलं.
ग्रहराज्यमंत्र्यांच्या जिल्हय़ात एका मोठय़ा प्रशासनाने असं मत व्यक्त करणं त्याहूनही गंभीर प्रकार आहे, याचीही चौकशी व्हायला हवी.
भीती घालाल तर याद राखा : शेखर सिंह
जम्बो हॉस्पिटलच्या प्रशासनाने असा निर्णय घेतल्याचे मला समजले. त्या ठिकाणी काही घटना घडल्या म्हणून त्यांनी तसा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे असले तरी अशी कोणतीही कृती कि जी दहशत निर्माण करेल ती मी चालू देणार नाही. राज्यातल्या अन्य मेट्रोपोलिटंन सिटीज्मध्ये अशा उपाययोजना राबवल्या गेल्या असतील मात्र साताऱयात ते होऊ देणार नाही. ‘कोणत्याही रूग्णाला किंवा नातेवाईकाला जर भिती घालाल तर याद राखा’ अशा शब्दांत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दम भरला असून मंगळवारी सकाळीच याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.