जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लागल्या टपऱ्या
सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरात सर्वत्र टपऱ्यांचे साम्राज्य झाले आहे. शहरातील एक ही रस्ता असा नाही जिथे अतिक्रमण करून टपऱ्या टाकलेल्या नाहीत. सातारा नगर परिषद अतिक्रमण विभागामार्फत शहरातील राजवाडा, मंडई, पोवई नाका मंडई, स्टँड मंडई या ठिकाणी रस्त्यावर बसलेल्या भाजी व फळे विक्री करणाऱ्या गरीब लोकांवर वारंवार कारवाई केली जाते. त्यांचा संपूर्ण माल, वजन काटे जप्त केले जातात. मात्र, शहरात बोकाळलेल्या टपरी चालकांवर कारवाई मात्र होताना दिसत नाही.
शहरातील जिल्हा सत्रन्यायालय शेजारी काही दिवसांपूर्वी एक उसाचे गुराळ टाकण्यात आले होते. त्याच दिवशी अतिक्रमण विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी त्या ठिकाणी पोहचले. न्यायालय परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत कोणतेही दुकान अथवा टपरी टाकण्यास परवानगी नाही, असे सांगून सदरचे गुराळ काढण्यात आले. मात्र, आज त्याच ठिकाणी एक टपरी आणि एक लिंबू सरबताची गाडी लावण्यात आली असून, याच मार्गवरून रोज जाणाऱ्या अतिक्रमण विभागाचा लोकांना हे दिसत नाही का? की कुणाचा सांगण्यावरून जाणून बुजून डोळेझाक केली जात आहे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे काम फक्त गरीब भाजीविक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यापूरतेच मर्यादित आहे का, की टपरीधारकाशी काही हित संबंध आहेत, याची चर्चा सध्या नागरिकांमधून होत आहे.