साताऱ्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची 59 वर्षे प्रतीक्षा, 1963 मध्ये झाली होती महाराष्ट्र केसरी स्पर्धा
देवदास मुळे / कराड :
देशाचे पहिले ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांच्या कुस्तीतील विश्वविजयाचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्हय़ात 64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 4 एप्रिलपासून रंगणार आहे. राजधानी साताऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. 1963 साली साताऱ्यात तिसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्यात आली होती. मात्र त्यावेळी महाराष्ट्र केसरीची मुख्य लढत रद्द झाली होती. असे कुस्तीगीर परिषदेचा इतिहास सांगतो. त्यानंतर सुमारे 59 वर्षांनी या स्पर्धेचा थरार सातारकरांना पाहावयास मिळणार आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची आजपर्यंतची अधिवेशने आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आजवरचा इतिहास अतिशय रोचक आहे. 1953 पासून कुस्ती अधिवेशन होत होते. 1961 सालापासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा शुभारंभ झाला. 1961 साली औरंगाबादला पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचे दिनकर दहय़ारी हे महाराष्ट्र केसरी झाले. तर 1962 साली धुळय़ाच्या स्पर्धेत सांगलीचे भगवान मोरे यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला. त्यानंतर 1963 साली सातारा येथे कुस्तीगीर परिषदेचे अधिवेशन व महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. मात्र महाराष्ट्र केसरीसाठीची मुख्य लढत त्यावेळी रद्द झाली होती, असे इतिहास सांगतो.
शिवछत्रपतींचा वारसा लाभलेल्या सातारानगरीत ऑक्टोबर 1963 साली कुस्ती परिषदेचे आठवे अधिवेशन मोठय़ा थाटामाटात पार पडले होते. या अधिवेशनात तिसरी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होणार होती. राज्यातून सुमारे 365 मल्ल या अधिवेशनातील कुस्त्यांसाठी आले हेते. तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. तर तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र केसरीची गदा कोणालाच देण्यात आली नव्हती. या मानाच्या कुस्तीसाठी एकही स्पर्धक आलेला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा रद्द करावी लागली. स्पर्धक न आल्याने रद्द झालेली ही राज्यातील एकमेव स्पर्धा अशी त्याची नोंद झाली होती. तरीही हौशी व विद्यार्थी विभागात अनेक चटकदार कुस्त्या झाल्या होत्या. त्यावेळी या स्पर्धांचे आजच्या सारखे आकर्षण नव्हते. तरीही साताऱ्यातील कुस्त्यांना मैदान खचाखच भरलेले होते, अशी नोंद कुस्ती परिषदेच्या इतिहासात आहे. साताऱ्यात कुस्तीला लोकाश्रय होता, हे या इतिहासावरून स्पष्ट होते.
चार वर्षांपूर्वी सातारा कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यात घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी यश आले नाही. मात्र यावर्षी स्पर्धा साताऱ्यात होत आहे. सुमारे 59 वर्षांची प्रतीक्षा संपली असून सातारकरांना कुस्तीतला थरार अनुभवायला मिळणार आहे.