जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन; खासदार उदयनराजे आंदोलन स्थळी
प्रतिनिधी / सातारा :
कोरोनाच्या नावाखाली गेली दोन वर्षे कोणतीही सैन्य भरती, पोलीस भरती झालेली नाही. भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या काही युवकांची वयोमर्यादा ओलांडली असून बेरोजगारीच्या वणव्यात त्यांची जीवनाची होरपळ सुरु आहे. अशा वेळी सैन्य भरतीवर बंदी घालणारे जिल्हाधिकारी या युवकांच्या भविष्याची जबाबदारी घेणार आहेत का? असा संतप्त सवाल करत जिल्हाभरातील शेकडो युवक-युवती सैन्य भरती घेण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देवून आंदोलक व प्रशासनाची चर्चा केली.
कॉम्रेड्स सोशल ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे गेले दोन वर्ष सैन्य अथवा आर्मीमध्ये भरती करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे सैन्यदलात भरती होण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या, मेहनत घेत असलेल्या युवक-युवतींवर यामुळे मोठय़ा प्रमाणावर अन्याय झाला आहे. भरतीसाठी असणारा वयाचा निकष संपून गेल्यामुळे जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींचे भविष्य पणाला लागले आहे. सैन्य भरतीसाठी केलेल्या अपार कष्टांवर पाणी फिरत असल्याने जोपर्यंत सैन्यभरती कधी घेणार हे जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा इशारा युवक, युवतींनी दिला. यावेळी कॉम्रेड ऑर्गनाझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. जयवंत आवळे, सचिव कॉ. अमोल साठे, सातारा जिल्हाध्यक्ष बासित चौधरी, कराड तालुकाध्यक्ष कॉ. रणजित भिसे उपस्थित होते.
यावेळी अनेक युवक, युवतींनी भावना व्यक्त करत मनातील उद्वेग बाहेर काढला. दोन वर्षापासून कोरोनाने जिल्ह्यात मुक्काम ठोकल्यामुळे आयोजित सैन्यभरती जवळ आल्यानंतर त्यावर स्थगिती आणली जात आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे आर्मीची भरती घेण्यात आली होती. मात्र तेथील जिल्हाधिकाऱयांनी भरती घेण्यास मज्जाव केला. सैन्य दलात 5 मार्च रोजी भरती जाहीर केली असताना ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी, राज्य शासनाने, केंद्र शासनाने तातडीने निर्णय घेवून सैन्य भरतीची प्रक्रिया राबवावी, नसलेला कोरोना लोकांच्या माथी मारुन टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार थांबवा, अशी मागणी एका युवकाने यावेळी केली.