वृत्तसंस्था/ बाली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2021 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे बुधवारपासून सुरू होणाऱया विश्व टूर फायनल्स स्पर्धेसाठी भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
गेल्या आठवडय़ात येथे झालेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, उपांत्य फेरीत त्यांना जपानच्या कोगा आणि साटो यांच्याकडून हार पत्करावी लागली. उपांत्य सामन्यात सात्विक साईराज आणि चिराग यांना 16-21, 18-21 अशी हार पत्करावी लागली. पुरुष दुहेरीतील अग्रमानांकित जोडी गिडॉन आणि सुकामुलेजो यांना उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. तसेच जपानच्या होकी आणि कोबायाशी यांनी आपल्याच देशाच्या अकिरा आणि तेचि यांचा 22-20, 21-14 असा पराभव केल्याने भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना विश्व टूर बॅडमिंटनच्या फायनल्ससाठी प्रवेश मिळाला.
15 लाख डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या विश्व बॅडमिंटन टूरच्या फायनल स्पर्धेसाठी भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने आपली पात्रता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू, अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिकी रेड्डी सहभागी होणार आहेत.