दोडामार्ग सरपंच संघटनेचा तीव्र विरोध : आज जिल्हाधिकाऱयांची भेट घेणार
वार्ताहर / दोडामार्ग :
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने 8 जुलै रोजी जिल्हाधिकाऱयांनी घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त सरसकट रद्द केल्यास आम्ही कृती समितीचे सामूहिक राजीनामे देऊ, असा इशारा दोडामार्ग तालुका सरपंच सेवा संघाने दिला आहे. या संदर्भात 14 जुलै रोजी जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्यात येणार आहे. चतुर्थी कालावधीत चाकरमान्यांचे सात दिवसांचे क्वारंटाईन करण्यास आमचा विरोध असून ते 14 दिवसांचेच हवे, अशीही मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात येणार असल्याचे सरपंच संघटनेने स्पष्ट केले.
येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पराशर सावंत व पदाधिकारी कुंब्रल सरपंच प्रवीण परब, उसप सरपंच दिनेश नाईक, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस, कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, आयनोडे सरगवे सरपंच मधुरा नाईक, झरेबांबर सरपंच स्नेहा गवस, तेरवण मेढे सरपंच प्रियांका सोनवलकर, केर उपसरपंच महादेव देसाई, घोटगे उपसरपंच प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते.
गेले साडेचार महिने कोरोनाशी निगडीत लॉकडाऊन कालावधीत सरपंच संघटनेने कृती समिती स्थापन करून काम केले आहे. ज्या-ज्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी चार दिवसांनी पोचतात, त्या ठिकाणी या लोकांचे प्रश्न व सुविधा सोडविण्यात मोलाची जबाबदारी बजावली आहे. स्थानिक पातळीवर अशाप्रसंगी कसे काम करायचे, हे सर्वांना चांगले माहिती आहे. म्हणूनच गेल्या आठवडय़ात आगामी चतुर्थी कालावधीच्या अनुषंगाने या बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी निर्णय घेतले त्या बैठकीचे इतिवृत्त सरसकट रद्द करण्यास आमचा विरोध आहे. कोकणात गणेशोत्सव हा मोठा सण आहे. त्यावेळी मुंबई-पुणे तसेच अन्य भागातून मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी येतात. सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने 7 दिवसांचे क्वारंटाईन न ठेवता ते 14 दिवसांचेच ठेवावे. यामध्ये काही बदल झाल्यास आम्ही सामूहिक राजीनामे देणार असून गावांची जबाबदारी शासनाने घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
चाकरमान्यांनी गावाची क्षमता ओळखावी!
चतुर्थी कालावधीत अनेक चाकरमानी आपापल्या गावी येऊ इच्छीत आहेत. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आपल्या गावाची गृहविलगीकरणाची नेमकी क्षमता किती आहे व कशा स्वरुपात आहे ते अगोदर चाकरमान्यांनी नीट अभ्यासावे. चाकरमान्यांनी आपल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी खुद्द चाकरमान्यांनी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील सरपंचांशी संपर्क साधल्याशिवाय चाकरमान्यांनी आपल्या गावात प्रवेश करू नये, असे यावेळी सरपंचाकडून आवाहन करण्यात आले.
तहसीलदारांकडून ती बैठक अद्यापही नाही
दोडामार्ग तालुक्यातील तिन्ही जि. प. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशाताई व इतरांची महत्त्वपूर्ण बैठक गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घेतली जाईल, असे प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापपर्यंत ही बैठक झालीच नसल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दोडामार्ग तहसीलदारांना या प्रश्नाचे गांभीर्य नाही की काय? असा सवाल देखील यावेळी सरपंचांनी केला.