कोरोनाबरोबरच पाऊस-पूरस्थितीचा घेतला आढावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विविध सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाबरोबरच राज्यातील पूर आणि पावसाच्या स्थितीची माहिती जाणून घेत त्यांनी काही निर्देशही राज्यांना दिले.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी बिहार, आसाम, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. बिहार आणि आसाम ही राज्ये सध्या पूरस्थितीचा सामना करत आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना त्यांनी पाऊस आणि पुराबाबतचीही माहिती घेतली. तामिळनाडूत सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. तसेच आसाम, आंध्रप्रदेश, बिहार, तेलंगणा येथेही रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पंतप्रधानांनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
आसाममधील पूरस्थितीची दखल
आसाममध्ये 26 जिल्हय़ांमधील जवळपास 28 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रम्हपुत्रा नदी तुडुंब भरून वाहत असल्याने 1 लाख 18 हजार हेक्टर क्षेत्रातील भूभाग व पीके पाण्याखाली गेली आहेत. भयावह पूरस्थितीमुळे आतापर्यंत 48 हजार लोकांना निवारा छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. राज्यात विविध ठिकाणी साडेसहाशे निवासी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 81 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात मोठे अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱया काझिरंगालाही पुराच्या पाण्याचा फटका बसला असून अनेक प्राणी मृतावस्थेत सापडत आहेत. यात काही गेंडय़ांचाही समावेश आहे. या सर्व बाबींची पंतप्रधानांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली. केंद्रीय पातळीवरून मदत पुरविण्याचे आश्वासन त्यानी आसाम मुख्यमंत्र्यांना दिले आहे.