अध्याय अकरावा
साधुपुरुष असतो तरी कसा हे जाणून घेण्याची उद्धवाला मोठी उत्सुकता लागली होती म्हणून त्याचे उत्तमोत्तम तीस गुण निवडून भगवंत त्यावर विवेचन करत आहेत. गेले काही भाग आपण त्याचा अभ्यास करत आहोत. मागील भागात आपण सावधानता, गांभीर्य आणि धैर्य हे गुण समजून घेतले. त्याविषयी बोलताना भगवंत म्हणाले, ह्या मनासारखे लबाड ह्या जगात आणखी कोणी नाही. ते नानाप्रकारचा छळ करून शहाण्या लोकांनासुद्धा नाडते. साधु मात्र त्या मनाचे मारक (दमन करणारे) असतात. कृष्णसर्पाचे तोंड हातात धरले असता हात जर ढिला सोडला, तर तो तात्काळ चावतो. याकरिता तो मरेपर्यंत त्याचे तोंड आवळलेच पाहिजे. त्याचप्रमाणे साधु मनाचे निर्दालन करतात. मनाचे निर्दालन करावे अशाकरिता जी सावधानता सांगितली आहे, तेच साधूचे लक्षण होय. हा त्याचा एकोणिसावा गुण. रात्र आणि दिवस ही आली किंवा गेली, तरी सूर्याच्या प्रकाशात काही पालट होत नाही. त्याप्रमाणे निरनिराळय़ा स्थिति आल्या किंवा गेल्या तरी साधूचा गंभीरपणा क्षुब्ध होत नाही. त्याप्रमाणे कितीही विकारांच्या उसळय़ा आल्या तरी त्यामध्ये अढळ असणे याचंच नाव गांभीर्य. ही संताची विसावी अवस्था होय. आता धैर्याचे स्वरूप ऐक. साधू आपल्या धैर्याने मन-बुद्धय़ादि इंद्रिये व प्राण ह्यांना आपणच आवरून धरून नित्य आत्मसन्मुख करतो आणि परत जाऊ देत नाही. धैर्याने मनाला आवरून धरून त्याला देहाकडे येऊ देत नाही. देहाला अनेक प्रकारची सुखे प्राप्त झाली, किंवा त्याला हत्तीवर बसविले, तरी तो मनाला देहाभिमान धरू देत नाही. ह्याचंच नाव धैर्य. हा साधूचा एकविसावा गुण होय. आता षड्विकार कसे जिंकले जातात तेही लक्षण ऐक. साधु स्वानंदाने तृप्त झालेला असतो, म्हणून त्याला भूक लागत नाही. जगाच्या जीवनाने तो संतुष्ट झालेला असतो, म्हणून तो तहानही निखालस विसरून जातो. आत्मसुखाचा उपभोग घेता घेता शोक आणि दुःख विसरूनच गेला, चित्स्वरूपाच्या ज्ञानाने संशयरहित झालेला असल्यामुळे मोहही त्याच्यासमोर येत नाही. तो जागृति, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थांच्या बाहेर आत्मज्ञानाच्या ओवरीत राहात असतो. तेथे जरी म्हातारी जख्खड झालेली जरा आली, तरी तीच थरथरा कापत पळून जाते. देहपणाने देहाचे भानही त्याला राहात नाही. त्यामुळे मरणालाच मरण येते. कारण त्याने काळालाही गिळून टाकलेले असते. ह्याप्रमाणे हे षड्विकार अनायासेच जिंकून टाकून साधु लोक खुशाल ह्या जगात राहतात. हे साधूचे बाविसावे लक्षण होय. ब्रह्मस्वरूप असलेला आपला स्वामी त्याला सर्व प्राणिमात्रांमध्ये दिसत असतो. तेव्हा मनाची इच्छा कोणापासून करावयाची? म्हणून खरोखर मानाभिमान सोडून अतिशय नम्रवृत्तीने त्याचे वागणे चालू असते. आधी देहामध्ये अभिमान धरावा, तेव्हा मग मोठय़ा सन्मानाची इच्छा करता येते असा नियम आहे. पण येथे देहाचे भानच मुळी खुंटलेले असते. तेव्हा अर्थातच मानाभिमानही रसातळालाच जातात. ह्याचेच नांव ‘अमानिता’ (म्हणजे निरभिमानपणा). हे साधूचे तेविसावे लक्षण. आता साधु हा सन्मान देणारा कसा असतो तेही ऐक. तो ब्रह्मदेवापासून तो माशीपर्यंत सर्वांना शिरसावंद्य मानितो. ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरी बुद्धीच तो जाणत नाही. सर्व प्राणिमात्रांमध्ये तो ब्रह्मरूप पाहतो, आणि म्हणून सर्वांपुढेच तो आनंदाने लोटांगण घालतो. देव, मनुष्य किंवा गाढव हा भेदाभेद मनात आणीतच नाही. सर्वांनाच तो मोठय़ा संतोषाने वंदन करतो. मोठय़ा कौशल्याने निरनिराळे अलंकार घडविलेले असले, तरी सोन्याच्या सोनेपणात काही कमतरता येत नाही. त्याप्रमाणे नावाच्या किंवा रूपाच्या निरनिराळय़ा प्रकाराने आपल्या मनात बदल करावा हे तो जाणतच नाही. साखरेची निंबोणी (कडूफळ) केली, तर त्यात काही कडूपणा येत नाही. त्याप्रमाणे जरी डुकरासारखी कनि÷ जात असली, तरी तिच्यातील ब्रह्मस्वरूप काही नाहीसे होत नाही.
क्रमशः