अध्याय अकरावा
साधुलक्षणे उद्धवाला सांगताना भगवंत म्हणाले, ‘मला शरण येणे’ हे सोळावे लक्षण. नदी समुद्राला शरण आली तर ती त्याच्याशी एकरूप होऊन समुद्रस्वरूप होते. त्याप्रमाणे जी वृत्ति मला शरण आली की ती मत्स्वरूपच झाली असे समजावे. पण मला शरण येऊन जो मानसन्मानाची किंवा कीर्तीची इच्छा करतो, तो काही मला अनन्यभावाने शरण आलेला नसतो. आता जो ‘मनन’ गुण आहे तो ऐक. वेदशास्त्रांचे निरूपण व गुरुवाक्मयाचे निरूपण ऐकले असता किंवा अद्वैताचे श्रवण केले असता, त्या सर्वांचे युक्तीने साधकबाधक प्रमाणांनी आपल्याच मनाशी वारंवार विचार करणे त्याचे नांव ‘मनन’ होय. माझे मनन करताना मन गप्पच झाले म्हणजे मग ते कोठेही गेले किंवा गेले नाही तरी त्याची मद्रुपता मोडत नाही. अशा प्रकारे माझे जे केवळ शुद्ध स्वरूप आहे, तेथे ज्याचे मन मत्स्वरूपाने स्थिर होऊन ध्रुवाप्रमाणे अढळ, राहते त्याला ‘मननशील’ असे म्हणतात. ‘मुनि’ या शब्दाचा अर्थ मननशीलता असाच आहे हे लक्षात ठेव. हेच साधूचे अठरावे लक्षण होय. जोपर्यंत मन वृत्तिशून्य होत नाही, तोपर्यंत चाणाक्ष मनुष्य त्यावर विश्वास ठेवीत नाही. वृत्तीच्या रूपाने मन आपल्याला ठकवील म्हणून तो आत्मज्ञानाने सावध असतो.
अरे ! दुर्वासासारखा ज्ञानी असूनही त्याला मन क्षणोक्षणी राग आणते. ह्या मनासारखे लबाड ह्या जगात आणखी कोणी नाही. ते नानाप्रकारचा छळ करून वर्म काढून ज्ञाते लोकांनासुद्धा नाडते. साधु मात्र त्या मनाचे मारक ( दमन करणारे ) असतात. मला कशाचा मोह नाही असा माणसाचा स्वतःबद्दल समज असतो पण त्याची ही चुकीची समजूत त्याला विषयी करून सोडते. ‘मुक्त झालों’ असा अभिमान बाळगावयाचा आणि विषयात आसक्ति ठेवावयाची, हेच मनःक्षोभाने प्राप्त होते. म्हणून वृत्ति असेपर्यंत साधूंना मुक्ति ही मुळीच मान्य नाही. कृष्णसर्पाचे तोंड हातात धरले असता हात जर ढिला सोडला, तर तो तात्काळ चावतो. याकरिता तो मरेपर्यंत त्याचे तोंड आवळलेच पाहिजे. त्याचप्रमाणे साधु मनाचे निर्दालन करतात. मनाचे निर्दालन करावे म्हणून जी सावधानता आवश्यक आहे, तीच साधूची सावधानता होय. हा त्याचा एकोणिसावा गुण. आता विसावा गुण ऐक. पर्जन्यकालात पाण्याने तुडुंब भरलेल्या नद्या समुद्रात शिरल्या तरी समुद्र फुगत नाही. किंवा उन्हाळय़ात त्या नद्या तशा तुडुंब भरून आल्या नाहीत तरी त्या रागाने समुद्र आटून जात नाही. त्याप्रमाणे द्रव्याची रेलचेल झाली तरी साधूचे मन उल्हास पावत नाही, किंवा सर्वस्व जाऊन जो निर्धन झाला तरी दीनवाणे व्हावे हे जाणत नाही. रात्र आणि दिवस ही आली किंवा गेली, तरी सूर्याच्या प्रकाशात काही पालट होत नाही. त्याप्रमाणे निरनिराळय़ा स्थिति आल्या किंवा गेल्या तरी साधूचा गंभीरपणा क्षुब्ध होत नाही. विजेचे लोळ कडकडून उठले तरी आकाश काही डगमगत नाही. त्याप्रमाणे कितीही विकारांच्या उसळय़ा आल्या तरी त्यामध्ये अढळ असणे याचंच नाव गांभीर्य. संताची गंभीरता म्हणतात ती ही. तीच खरोखर जीवाला आणि शिवाला विश्रांति आहे. ही संताची विसावी अवस्था होय. आता धैर्याचे स्वरूप ऐक. जो आपल्या धैर्याने मन-बुद्धयादि इंद्रिये व प्राण ह्यांना आपणच आवरून धरून नित्य आत्मसन्मुख करतो आणि त्यांना तेथून परत जाऊ देत नाही किंवा स्वयंवरामध्ये प्रबळ शत्रूला जिंकून पराक्रमाने नवरीला आणल्यानंतर तो तिला दुसऱयाकडे जाऊ देत नाही, त्याप्रमाणे साधूही आपल्या वृत्तीपासून धैर्य सुटू देत नाही. जाळय़ात धरलेल्या मृगाला पारधी जसा पुन्हा त्या बनाकडे जाऊ देत नाही, त्याप्रमाणे साधूही धैर्याने मनाला आवरून धरून त्याला देहाकडे येऊ देत नाही. देहाला अनेक प्रकारची सुखे प्राप्त झाली, किंवा त्याला हत्तीच्या मस्तकावर बसविले , तरी तो मनात देहाभिमान धरत नाही. ह्याचंच नाव धैर्य. हा साधूचा एकविसावा गुण होय. आता षड्विकार कसे जिंकले जातात तेही लक्षण ऐक. साधु स्वानंदाने तृप्त झालेला असतो, म्हणून त्याला भूक लागत नाही. जगाच्या जीवनाने तो संतुष्ट झालेला असतो, म्हणून तो तहानही निखालस विसरून गेला असे होते.
क्रमशः