अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, प्रत्युपकाराची इच्छा न ठेवता दीनजनांचे दुःख निवारण करणे ह्याचेच नाव कारुण्य. साधू निरिच्छ असून दयाळू असतो. दयेच्या समुद्रानेच त्याची दृष्टि भरून गेल्यामुळे तो आपले तन-मन-धन खर्च करूनही अनाथावर अत्यंत दया करतो आणि दीनदुबळय़ांना संकटातून मुक्त करतो. वेदातील आणि शास्त्रातील रहस्य ज्याला केवळ तळहातावर ठेवलेल्या आवळय़ासारखे माहीत झालेले आणि जो ब्रह्मानंदात डुलत राहणारा, त्याचेच नाव खरोखर ‘कवी’. आता पुढील अत्यंत गहन अशी दोन लक्षणे राहिली आहेत, ती सांगावीत असा श्रीकृष्णांनी विचार केला. ते म्हणाले, प्रपंचनगराच्या सभोवार कर्माची दुस्तर नदी असल्याचे प्रसिद्धच आहे. तिच्याच पाण्यावर जीव वागत असतात. प्रपंचाच्या नगरीतून निघून परमार्थाकडे धावत धावत जो जो येऊ लागतो, तो तो कर्मनदीमध्येच गटांगळय़ा खाऊन बुडून जातो. ह्या कर्मनदीची उत्पत्ति खरोखर माझ्यापासूनच आहे. माझ्या आज्ञेने कर्मनदीत अनिवार भरती उसळली आणि जेथल्या तेथे पूर दाटून राहिला. उतार कोठून आहे हे कोणासच कळेना. तेथे गुणदोषांचा वेढा पडून विधिनिषेधांच्या धारेमध्ये कर्माकर्माचा भोवरा आतबाहेर फिरत राहिला. संकल्पविकल्पांचे बुरुज मध्ये आड आल्यामुळे ती नदी चहूकडे अफाट पसरली आहे. तिला जो तरून जावयास पाहतो, तो त्या बुरुजांना अडकून बुडून जातो. एक पाऊलही पुढे घालवत नाही. दुष्कर्मांची मगरमिठी पडली म्हणजे मग तर बोलावयासच नको. ती हा हा म्हणता अधोगतीला नेते. त्याचे अलंकारिक भाषेत वर्णन करायचे म्हटले तर काहीसे असे करता येईल. कर्मठपणाचे कासव तर दगडासारखे कठीण असते. कोणी विलास भोगून आळशी बनलेले असतात, ते काळविक्षेप या लाटांच्या सपाटय़ात सापडतात. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तोंडातून शब्दसुद्धा काढवत नाही. कोणी तरून जाण्याच्या आशेने कर्माच्या धारेतच सापडतात. ते विधिनिषेधाच्या वळणात गुंतून बहुधा बाहेरच पडत नाहीत. कोणी स्वकर्माच्या प्रवाहात सापडून लांब वहावत जातात. त्यांना मगरांनी नेऊन आपल्या खबदाडात टाकलेले असते. कोणाला तर पलीकडे जाववतच नाही. ते मध्येच सुंदर फळं पाहून आडमार्गाला धावतात आणि स्वर्गाच्या संकटात अडकून पडतात. आपण युक्तीच्या बळाने तरून जाणार असे म्हणून जे निघतात, ते अहंकाररूप खळाळात पडले म्हणजे देवमासे त्यांना गिळून टाकतात.
कोणी तिन्ही वेदांची पेटी दीक्षारूप दोरीने बांधून पोटाखाली घेतात, ते अप्सरांच्या कुचरूपी गुहेमध्ये गुंतून पडून शेवटी बुडतात. मंत्रतंत्रांचा खटाटोप करणारे बिचारे दीक्षित तर गुंतून जाऊन जेथल्या तेथेच बुडतात. तात्पर्य कर्मनदीच्या पलीकडच्या तीराला पोचणारे कोणीच दिसत नाहीत. येथे असा भाग्यशाली विरळाच. असा भाग्यशाली कोण असतो तेही सांगतो. जो कोणी एखादा हे सर्व उपाय एका बाजूस ठेवून अनन्य भक्तीने माझे भजन करतो, त्याच्यासाठी मात्र ही कर्मनदी कोरडी ठणठणीत पडते.
जोपर्यंत माझे भक्तिरूप तारू सापडत नाही व जोपर्यंत प्रेमाचे शीड चढत नाही, तोपर्यंत सर्व प्रकारचे तरणोपाय दुर्बळ होत. मग वेडे लोक व्यर्थ यातायात का करतात? अनन्य भक्तीचा मार्ग धरून सर्व धर्मकर्माचा त्याग करणे हाच उत्तम तरणोपाय आहे. इतर कोणताही उपाय दुर्बळ व अधःपातास नेणारा असतो. आपला धर्म कोणता व कर्म कोणते हे न जाणून घेता किंवा स्वतःच्या मनानेच नास्तिकपणाचा स्वीकार करून किंवा आळसाला बळी पडून, काही लोक कर्मच सोडून देतात, तसा मात्र हा प्रकार नव्हे. शरीराला क्लेश होतील या भयाने किंवा केवळ कंटाळा करून, किंवा ज्ञानाचा अभिमान धरून तो कर्म सोडीत नाही, हे लक्षात ठेव. माझी वेदरूप आज्ञा अत्यंत पवित्र आहे. त्या वेदांचा सविस्तर विचार करून स्वधर्मकर्माचे जे कर्मवाद आहेत, ते जाणणारा आणि स्वधर्माचा गुण अत्यंत उत्तम आहे व यांच्यात बिघाड झाल्याने अधःपतन घडते हे लक्षात घेऊन साधू माझ्या भक्तीला प्राण विकतात हेच त्यांचे पुढील लक्षण होय.
क्रमशः