अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, एकादशीचे व्रत करणाऱयाच्या घरात मी सदा सर्वदा नांदत असतो. कारण सर्व पर्वकाळांमध्ये श्रे÷स्थानी एकादशीच आहे. एकादशीचे व्रत करणारा माझा भक्त व्रते आणि तीर्थे ह्यांचा राजा आहे. तो माझ्या कुटुंबातलाच एक आहे. माझे भक्त जेव्हा त्याच्या घरी येतात तेव्हा सर्व पर्वकाळ त्याच्या दाराशी येऊन उभे राहतात. वैष्णवांना तर तो वेळ दिवाळी-दसऱयाप्रमाणे आनंददायक होतो. त्या समयी सर्व तीर्थेच घरी आल्याप्रमाणे होते. त्या दिवसावरून चंद्रसूर्याची ग्रहणपर्वेसुद्धा ओवाळून टाकतात. कपिलाषष्टी तर त्या दिवसाची दासी होऊन राहते, माझ्या भक्तांचे आगमन असे पुण्यप्रद आहे. त्याचा उल्हास मनामध्ये मावत नाही. त्याच्याकरिता सर्व धनधान्य खर्च झाले तरी ते आनंदाने नाचत असतात. अशी माझ्या भक्तांची वैष्णवांना आवड व त्यांच्या संगतीची अतिशय गोडी असते. त्यालाच भक्तीचे पीक असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी भगवंतांचं मनोगत जाणलेलं असल्याने त्यांनी त्यावर अभंग रचला तो असा, धन्य आजि दिन। झाले संताचे दर्शन ।1 ।जाली पापातापा तुटी। दैन्य गेले उठाउठीं ध्रु. जाले समाधान। पायी विसावले मन ।2।तुका म्हणे आले घरा। तोचि दिवाळीदसरा ।3।संत घरी येतील त्या दिवशी कोटय़वधि पर्वच जणू काही प्राप्त होतात. संत घरी आल्यावेळी वैष्णवाची आदराने लगबग सुरु होते. काय करू आणि काय नको अशी त्याची अवस्था होते. तो श्रीहरीची मंदिरे शृंगारतो व गुढय़ा तोरणे उभारून मखरे बांधून मोठा उत्सव करतो. संतांना मोठय़ा आदराने बसवून घेऊन वैष्णव मोठय़ा चातुर्याने कीर्तनाचा आरंभ करतात, आनंदाने व आवडीने नाचतात आणि मोठय़ा उत्कंठेने अंगविक्षेपादि हावभाव करून दाखवितात. टाळ, वीणा, मृदंग मोठय़ा कौशल्याने वाजवीत व अनेक प्रकारची चरित्रे गायन करीत मोठा गजर करतात आणि वेळोवेळी आनंदाने गर्जना करून हरिनामाचा जयघोष करून सोडतात.
आता दीक्षेचे लक्षण ऐक. वैदिक आणि तांत्रिक अशा दोन प्रकारच्या दीक्षा आहेत. वेदोक्त ग्रहण करणे ती वैदिक दीक्षा होय आणि पुराणोक्त ग्रहण करणे ती तांत्रिक दीक्षा होय. वैष्णवव्रताचे ग्रहण करणे ती वैष्णव दीक्षा होय. त्यात पाच रात्री मंत्रानु÷ान करावे लागते. वैष्णव व्रताचा धर्म पाळण्यासाठी प्रतिवार्षिक येणारी पर्वे यथासांग चालवावी. चातुर्मासात सांगितलेली एकादशी इत्यादि व्रते व जयंत्या पाळाव्यात. अशा अनेक प्रकारच्या पर्वकाळात मोठा महोत्सव करून नानाप्रकारच्या पूजा, नीरांजने व दीपमाळा पाजळणे, मृदंग-टाळादि वाद्यांचा गजर करणे ही कार्ये करावीत आणि मोठय़ा आनंदाने उचंबळून यात्रेला निघावे. दिंडय़ा, पताका व ध्वज बरोबर घेऊन नामघोषाचा गजर करून सोडावा.
ज्या देवाच्या यात्रेला जावयाचे, तो देवच आपल्या घरात आणावा. ज्या मूर्तीवर आपली भक्ति बसली असेल, त्याच मूर्तीची स्थापना करावी. ही मूर्ति कशी असावी ते सांगतो. मूर्ती अति उत्तम प्रकारची घडवलेली असावी. ती नीटनेटकी, बांधेसूद आणि मनोहर असावी. ती अत्यंत निर्दोष असून भव्य व गोंडस आहे असे उद्गार साधूंच्या मुखातून निघावेत. मूर्ति अतिशय सुरेख असावी. ती कृश स्वरूपाची नसावी. तसेच अधोमुख करू नये, ती बोजड व वर तोंड केलेलीही असू नये किंवा रडकी व दुर्मुखलेलीही असू नये. अक्राळविक्राळ तोंडाची मूर्ति करू नये. तिचे डोळे सुंदर असावेत. सर्व अवयव पुष्ट असून ती सुप्रसन्न असावी. अंगांत व उपांगांत कोठेही उणीव असू नये. ती उत्तम चिन्हांनी युक्त व सुलक्षणी असावी. तिच्या हातात आयुधे असावीत. जी पाहताच तन-मन तृप्त व्हावे, जिचे दर्शन होताच तहान-भूक हरपेल अशा प्रकारे त्या मूर्तीचे गोंडस प्रसन्नमुख असावे. तसेच ती नाजुक असून तिच्या मुदेवर कृपेची छटा दिसावी. जी मूर्ति पाहताच मनात भरते, सर्वांना अतिशय आवडते आणि आपल्या आवडीने तिच्याकडे पाहिले असता अंतःकरणाला प्रेमाचा पूर चढतो, ती मूर्ती उत्तम होय.किंचित हास्यमुख असावी. अतिशय प्रसन्न मुद्रा असावी. जिच्या लावण्याच्या तेजाने मन प्रसन्न होऊन जाते, तीच सर्वांगसुंदर मूर्ति होय.
क्रमशः