वार्ताहर/ भुईंज
कवठे ता. वाई येथील राजेंद्र धर्माजी पोळ यांची सुकन्या पूजा व रहिमतपूर ता. कोरेगाव येथील बेदील उत्तमराव माने यांचे चिरंजीव अनिकेत यांचा विवाह चार महिन्यापूर्वी निश्चित झाला. मोठय़ा धूमधडाक्यात साखरपान सोहळा संपन्न झाला मात्र कोरोनाच्या संकटांमुळे विवाह मात्र साध्या पद्धतीने करण्याचे उभय पक्षाचे वतीने ठरवण्यात आले. सदर सोहळा वधूच्या घरासमोर मंडप घालून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला . या विवाह सोहळ्यासाठी खरे तर अनेक मान्यवर उपस्थित राहू शकले असते परंतु साध्या पद्धतीने विवाह पार पाडायचा ठरविल्याने कोणालाही निमंत्रण देण्यात आले नाही.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणसुद्धा समाजाचे देणे लागत असल्याची जाणीव उभय वधूवर पक्षाला झाल्याने विवाहातील अनावश्यक खर्च टाळून त्याचा उपयोग समाजासाठी व कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी देण्याची कल्पना मांडली गेली. सदर विवाहसोहळा सामाजिक अंतर व इतर सर्व नियम पाळून पार पाडण्यात आला. त्यानुसार वधु पक्षाकडून 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 साठी देण्याचे ठरविण्यात आले व वरपक्षाकडून 15 हजार रुपयांचा रहिमतपूर नगरपालिकेसाठी देण्याचे ठरविण्यात आले. वधूपक्षाकडून 51 हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तर रहिमतपूर नगरपालिकेसाठी वरपक्षाकडून 15 हजार रुपयांचा निधी हा रहिमतपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने,पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूरच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, नगरसेवक निलेश माने, विनायक पाटील, अविनाश माने, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, कवठे गावाचे सरपंच श्रीकांत वीर यांच्यासह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
भाऊ नाही लग्नाला पण मुख्यमंत्री निधीने आशीर्वाद मिळाला.
नवरी मुलीचा भाऊ प्रसन्न हा नेव्हीमध्ये असल्याने तसेच चुलता व चुलती गोवा राज्यात असल्याने वधूमाता व पित्याशिवाय या लग्नाला कुटुंबातील कोणीहि उपस्थित नव्हते तर नवरदेवाची सख्खी बहिणसुद्धा या विवाहास उपस्थित नव्हती परंतु अनावश्यक खर्च टाळून कोरोना निधीसाठी रक्कम दिल्याने आमच्या आप्तेष्टांचे आशीर्वाद आम्हाला या रूपाने लाभल्याची भावना यावेळी वधू व वर यांनी बोलून दाखवली..