महाराष्ट्रातील आरोप – प्रत्यारोपाची मालिका संपेना, सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षितच
ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत असून त्याआधी राज्यातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे नेते विधिमंडळाच्या बाहेर बसून निषेध करत आहेत. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यातच संध्याकाळी उशिरा सत्ताधारी पक्षाच्या झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर परखड शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे. “३० वर्ष सापाच्या पिलाला दूध पाजलं, ते वळवळ करत होतं, आता आमच्यावरच फुत्कारतंय”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावलं आहे.
चहापानानंतर आयोजित केलेल्याया कार्यक्रमासाठी रामटेक बंगल्यावर विद्युतरोषणाई करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, “सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दुध पाजलं, ते पिल्लू वळवळ करत होतं आता आमच्यावरच फुत्कारात आहे. सध्या देशात एक विकृती आहे, आणि त्यांच्याकडून घृणास्पद राजकारण सुरू आहे. विकृती पेक्षा घाणेरडेपणा आहे.” अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली.
देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांना झालेली अटक आणि दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत त्यांनी केलेला जागेचा व्यवहार यावरून निशाणा साधला होता. त्यावरूनच आता मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. “सध्या देशात एक घृणास्पद राजकारण सुरू आहे. तुमच्यात हिंमत असेल तर दाऊदला शोधून आणा? पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग तुम्ही दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीमध्ये बोलताना उपस्थित केला आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रोज एक नवीन आरोप एकमेकांवर केले जात आहेत. यामुळे राज्यातील संपूर्ण राजकारण तापलं आहे. राज्यात अनेक समस्या आहेत पण या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिक या आरोप-प्रत्यारोपांना कंटाळला असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी आता ते करत आहेत.