आपली वृत्ती सकारात्मक असेल तर कठीण बाबीही सोप्या होतात, असे म्हटले जाते. काही लोक ही संकल्पना खरी करुन दाखवितात. कठीण काळातही आपली कल्पकता जागृत ठेवून ते उपाय शोधतात आणि यशस्वीही होतात. अशीच कथा आहे, उत्तर प्रदेशातील बांदा जिल्हय़ातील गोमती नामक महिलेची.
कोरोना काळात अनेकांवर आर्थिक कुऱहाड कोसळली आहे. गोमती यांनाही याच संकटाशी दोन हात करावे लागले आहेत. तथापि, त्यांनी नशीबाला बोल न लावता आपल्यासारख्याच महिलांचा एक स्वयंसाहाय्य गट स्थापन केला आणि साबण तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. दोन वर्षांपूर्वी अवघ्या 15 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रारंभ झालेल्या त्यांच्या व्यवसायाने आता चांगलेच बाळसे धरले आहे. दोन वर्षांमध्ये या व्यवसायाची उलाढाल 15 लाखपर्यंत पोहचली आहे.
गोमती या फारशा शिकलेल्या नाहीत. भभुवा गावातील त्या एक सामान्य गृहिणी होत्या. त्यांचे पती कमलेश हे मजुरी करुन कुटुंबाचे पोट भरतात. नेहमी पैशाची चणचण असतेच. त्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे रोजगारातही सातत्य नव्हते. परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते, या म्हणीप्रमाणे गोमती यांनी हे आव्हान स्वीकारले आणि रोज खपणारी वस्तू म्हणून साबणाच्या उत्पादनाचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी या उत्पादनाची माहिती मिळविली. थोडे दिवस प्रशिक्षण घेतले आणि धाडसाने व्यवसाय सुरु केला. आपल्याबरोबर काही गरजवंत महिलांनाही घेतले. आज त्यांच्या या कल्पकतेला आणि धाडसाला काही प्रमाणात यश आले आहे. आपल्याबरोबर त्या अन्य 25 महिलांनाही रोजगार उपलब्ध करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची दखल प्रशासनानेही घेतली असून सहाय्य केले आहे.