ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. सामनातील भाषा ही आमची पितृभाषा आहे. त्यामुळे ‘सामना’ ची भाषा आणि दिशा बदलणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. सामनामध्ये झालेल्या पद बदलाबद्दल त्यांनी भाष्य केले. विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व शेतकऱयांचं 2 लाख पर्यंतचे कर्ज माफ करणारच, तसेच शेतकरी कर्जमाफी योजना लवकरच पूर्ण करु, 10 लाख शेतकऱयांचं प्रमाणीकरण झाले आहे, 7 लाख शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. गेल्या दोन महिन्यात पहिली यादी जारी केली. दुसरी यादी पण जारी केली. विदर्भातील पाच लाख शेतकरी कर्जमाफीची यादी तयार आहे, मात्र गडचिरोली, अमरावती, नंदुरबारसारख्या जिह्यातील स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जाहीर केली नाही, असं ही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणावर सरकार न्यायालयात ताकदीने लढत आहे. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा माझ्यासमोर आलेला नाही. मुद्दा समोर आल्यावर भूमिका स्पष्ट करु.
तसेच येत्या सात मार्चला मी प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहे. ज्यांना शक्मय आहे, त्यांनी यावं. मात्र देवदर्शनात राजकारण नको, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.