शहरात 250 तर ग्रामीण भागात 100 रुपये
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाची दुसरी लाट आणखी तीव्र होत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू जारी करण्याऐवजी सध्या जारी असणारे नियम आणखी कठोर केले आहेत. आरोग्य खात्याने यासंबंधीची मार्गसूची बुधवारी सायंकाळी जारी केली असून शहरी भागात मास्क न वापरणाऱयांना 250 रुपये दंड तर ग्रामीण भागात 100 रुपये दंड आकारण्याचा आदेश दिला आहे. कोविड मार्गसूचीचे पालन करण्यासंबंधी नेमलेल्या मार्शल, हेड कॉन्स्टेबलना दंड वसूल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सामाजिक अंतर न राखलेल्यांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने राज्य सरकारने कोविड तांत्रिक सल्लागार समितीशी चर्चा केली आहे. या समितीने खबरदारी उपाययोजना हाती घेण्याची सूचना राज्य सरकारला दिली आहे. दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी आदेश जारी केला असून बेंगळूर वगळता राज्यातील पालिकांच्या कार्यक्षेत्रात मास्क, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन न करणाऱयांना 250 रुपये आणि इतर भागात 100 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे विविध पाटर्य़ा, सभा-समारंभ, विवाह कार्यक्रमांमधील उपस्थितांच्या संख्येवरही मर्यादा घातली आहे. खुल्या जागेवरील विवाह समारंभांसाठी 500 आणि बंदिस्त हॉलमध्ये 200 पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीवर निर्बंध घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱयांना 5 हजार रु. दंड लागू केला जाणार आहे. त्याचप्रमाणे खुल्या जागेतील वाढदिवस कार्यक्रमासाठी कमाल 100 आणि बंदिस्त जागेत 50 पेक्षा कमी जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.