प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आल्याने जन्म व मृत्यू दाखला देण्याचे काम रखडले होते. पण शनिवारपासून दाखले वितरणास महापालिकेने प्रारंभ केला आहे. मात्र वितरण कक्षा समोर सामाजिक अंतर राखण्यात येत नसल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. त्यामुळे सामाजिक आंतर राखण्याचे आवाहन कुणासाठी? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने सामाजिक अंतर राखण्याचे तसेच तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य खात्याने आणि प्रशासनाने केले आहे. कोणतेही व्यवहार करताना सुचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लॉक डाऊन करण्यात आले होते. 42 दिवसाच्या लॉक डाऊननंतर विविध व्यवसाय काही अटींवर सुरू करण्यात आले होते. लॉक डाऊन कालावधीत जन्म मृत्यू दाखला देण्याचेही बंद ठेवण्यात आले होते. पण लॉक डाऊन शिथील करण्यात आल्याने सामाजिक अंतर राखण्याची सूचना करून जन्म मृत्यू दाखले वितरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे मंगळवारी सकाळी नागरिकांनी दाखले घेण्यासाठी मनपा कार्यालयात गर्दी केली होती. पण रंग लावताना सामाजिक अंतर राखण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या सूचनेला हरताळ फासल्याचे दिसून आले. महापालिका कार्यालयात विविध कामासाठी नागरिक येत आहेत. पण कार्यालयात येणाऱया नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याकडे महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.