वयाच्या तिसऱया वषी पाय अधू झाले आणि त्या चाकाच्या खुर्चीवर म्हणजे व्हिलचेअरवर बसल्या. साधारण 50 वर्षे त्या या खुर्चीवरच होत्या. परंतु एखाद्या चालत्या, फिरत्या माणसाला लाजवेल, इतके कार्य त्यांनी त्या खुर्चीवर बसून केले. बेळगावमधील अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांची खुर्ची हमखास दिसायची. अशी कार्यरत असलेली ती क्यक्ती म्हणजे शकुताई परांजपे.
शकुताईंचा जन्म 9 जानेवारी 1938 चा. सदुभाव परांजपे यांचे हे पहिले अपत्य. घरात त्यांचे आनंदाने स्वागत झाले. पण दुसऱया वर्षात त्यांना पोलीओचा फटका बसला आणि चिमुकलीच्या हातापायांतील ताकद गेली. उजवी बाजू आणि हातपाय लुळे पडले. शकु मोठी होत गेली. परंतु नियतीचे आवाहन त्यांनी आणि पालकांनीसुद्धा स्वीकारले. वयाच्या सातव्या वषी त्या 1 नंबरच्या शाळेत गेल्या. पुढे एसएसएलसी झाली. कॉलेजला जाण्याची इच्छा होती. परंतु कॉलेज झेपेना. म्हणून तिने बहिःस्थ परीक्षा देऊन त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली.
त्यानंतर मारुती गल्लीतील भगिनी वाचनालयात पाच रुपये पगारावर त्यांनी सहा वर्षे नोकरी केली. येथेच स्वतःचे वाचनालय का सुरु करु नये, असा विचार आला. त्यांनी तो पालकांना बोलून दाखविला. सदुभाऊंनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आणि शकुताईंची स्वतःची लायब्ररी सुरु झाली. परंतु फी वेळेवर मिळेना, पुस्तकेही परत केली जात नसत. म्हणून पैसा, वेळ आणि भांडवल अक्कलखाती जमा करुन त्यांनी लायब्ररी बंद केली. सतत कार्यरत राहणे हा तर शकुताईंचा स्थायीभावच होता. म्हणून त्यांनी शिकवणी सुरु केली. याच दरम्यान भरतकाम, विणकाम, कशिदा हे सुद्धा त्यांनी शिकून घेतले. मधुताई साठे-जोशींच्या शाळेत त्यांनी काही काळ कामही केले.
याच दरम्यान बक्षी यांनी त्यांना आपल्या दुकानात घेऊन 120 रुपये पगार ठरवून दिला. त्यानंतर कर्नाटक इलेक्ट्रिकसीटी बोर्डमध्ये त्यांना नोकरी मिळाली. मात्र कोणत्याही दिव्यांगाना होणारे त्रास आणि त्यांना हवें असलेले स्वावलंबन याची जाणीव असल्याने दिव्यांगांची संस्था स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 1972 सालापासून त्या दिव्यांगांच्या संस्थेत रुजू झाल्या. कोणतेही काम प्रामाणिकपणे, चिकाटीने न कंटाळता, न थकता ती करत असे. प्रथम नोकरी सुटली तेंव्हा मधल्या काळात त्या बेंगळूरला गेल्या. याच ठिकाणी त्यांना त्यांचे स्फूर्तिस्थान म्हणजेच एन. डी. दिवाण भेटले. ते सुद्धा अत्यंत हुशार परंतु पक्षाघातामुळे दुबळे झाले होते. परंतु ते सदैव कार्यरत होते. त्यांचीच प्रेरणा घेऊन शकुताईंनी 13 नोव्हेंबर 1972 मध्ये द फिजीकली हॅण्डीकॅप्ड असोसिएशन ही संस्था स्थापन केली.
या संस्थेत शकुताई प्रारंभापासून कार्यरत राहिल्या. येथील सहकर्मचाऱयांनी त्यांना समजून घेतले. या संस्थेला बेळगावसह बाहेरील अनेक संस्थांनी सातत्याने मदत केली. त्यामुळे 1987 साली संस्थेची स्वतःची ट्रेनिंग सेंटरची इमारत झाली. येथे मेणबत्त्या, गॅस एजन्सी, बाईंडिंग, स्टॅम्प्स अशा विविध स्वरुपाचे काम सुरु झाले. बुथही सुरु झाला. या सर्वांवर शकुताईंनी अपत्त्याप्रमाणे माया केली. येथील अनेक दिव्यांग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून चमकले. दिव्यांगांसाठी असणाऱया सर्व क्रिडास्पर्धांमध्ये त्या संस्थेतील मुलांना घेऊन जात. ही मुले चमकली. यासाठी शकुताईंचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन महत्वाचे ठरले.
आपल्याला मिळणारे वेतन त्यांनी जसे घरासाठी खर्च केले तसेच समाजासाठीही खर्च केले. कोणीही गरीब किंवा दिव्यांग यांचे शिक्षण पैशाविना अडले असल्याचे कळताच त्या परस्पर त्यांची फी भरुन टाकत. यामागे आपली प्रसिद्धी हा त्यांचा हेतू कधीच नव्हता. दुसऱयांच्या वेदना जाणून त्यांचे दुःख समजून त्या त्यांची मदत करत असत. संस्था मोठी करणे, त्यासाठी इमारत बांधणे आणि पैसा गोळा करणे या एकमेव ध्येयांनी त्या कार्यरत राहिल्या. संस्था मोठी झालेली त्यांनी डोळे भरुन पाहिली.
संस्थेमध्ये बास्केट, मेणबत्या, आकाशकंदील, कागदाची फुले असे उद्योग सुरु झाले. परंतु त्यांना बाजारपेठ मिळणे महत्वाचे होते. शकुताई जेथे जेथे प्रदर्शने होतात तेथे जाऊन या मुलांच्या कामाबद्दल माहिती देत आणि आविष्कारसह अनेक संस्थांनी त्यांना या वस्तु ठेवण्यासाठी विनामुल्य स्टॉल दिले. यातून दिव्यांग खऱया अर्थाने स्वावलंबी झाले.
या चाकाच्या खुर्चीची गती
30-8-2019 रोजी थांबली. परंतु तत्पूर्वी अनेकांना तिने गती दिली. आपल्या कमाईतील काही रक्कम त्यांनी शांताई वृध्दाश्रमाला दिली. त्यामध्ये त्यांच्या दोन बहिणींनी भर घातली आणि आज शांताई वृद्धाश्रमामध्ये ‘शकुताई परांजपे सभागृह’ उभे राहिले आहे. आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या सभागृहाचे उद्घाटन होत आहे. बेळगावकर तसेच शांताई वृद्धाश्रम आणि दिव्यांग संस्था नेहमीच शकुताईच्या सामाजिक कार्याबद्दल ऋणी असतील.
परिचीत