मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन माहिती न लपविण्याची सूचना भिलवाडा जिल्हय़ातील तयारीचा अभ्यास आतापर्यंत सर्व चाचण्या नकारात्मक
प्रतिनिधी / पणजी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सर्वेक्षण हे गोव्याच्या आणि गोव्यातील जनतेच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. या सर्वेक्षणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्याकडे कुणीही लक्ष देऊ नये. सर्वेक्षण टीममधील प्रमुखाना प्रशिक्षण दिले जात असून हे प्रमुख नंतर इतरांना प्रशिक्षण देणार आहेत, असेही ते म्हणाले.
या सर्वेक्षणात केवळ शिक्षकच नव्हे तर अंगणवाडी कर्मचारी, बीएलओ, तलाठी, पंचायत सचिव, कारकून पातळीवरील सरकारी कर्मचारी, आरोग्य खात्याचे कर्मचारी या सर्वांनाच समावून घेतले आहे. प्रायोगिक तत्वावर सर्वेक्षणाचे अर्जही काल भरून घेण्यात आले. प्रत्यक्षात सर्वेक्षणावेळी लोकांनी या कर्मचाऱयांना सहकार्य करावे व कोणत्याही प्रकारची माहिती लपविली जाऊ नये. सर्वेक्षणात सहभागी होणाऱया कर्मचाऱयांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे. घरात विलगीकरण पेलेल्या संशयित रुग्णांजवळ हे कर्मचारी जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.
सविस्तर माहिती द्यावी
घरातील एखादी व्यक्ती बाहेर प्रवास करून आली असेल तर त्याची सविस्तर माहिती द्यावी. थंडी, ताप असेल तर त्याचीही माहिती द्यावी. एवढेच नव्हे तर एखाद्या व्यक्तीला स्वतःबाबत संशय असेल तर त्यानेही स्वतः पुढे यावे व माहिती द्यावी. कोणतीही माहिती लपविली जाऊ नये. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास प्रथम त्याला कोरोना चाचणीसाठी पाठविले जाईल. या सर्व लोकांचा अहवाल सरकारपाशी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एखाद्या भागात रुग्ण आढळला तर त्या भागात पुढील काळजी घेण्याच्या दृष्टीने हा अहवाल उपयुक्त ठरणार आहे. लोकांनी कोणताही चुकीचा समज करून घेऊ नये.
भिलवाडा जिह्यातील तयारीचा अभ्यास
राजस्थानमधील भिलवाडा जिह्यात कशाप्रकारे कोरोना विरोधी लढा दिला, याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. भिलवाडातील अर्ज आणले आहेत. कशापद्धतीने तिथे काळजी घेतली याचा अभ्यास केला. तिथे सीमा बंद केल्या. नंतर जिह्याच्या अंतर्गत सीमा बंद केल्या, रेल्वे बंद केली. 3072 लोकांची सर्वेक्षण टीम तयारी केली. शहरी भागात 2,14,667 घरांमधील 10,71,315 लोकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेतून 4258 संशयित रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात 4,41,943 घरांमधील 2239164 लोकांचे सर्वेक्षण केले गेले. 17,500 लोकांना चाचणीसाठी पाठविण्यात आले. संशयास्पद वाटणाऱया लोकांचीच तपासणी करण्यात आली.
गोव्यातही अशापद्धतीने संशायास्पद वाटणाऱयांचीच तपासणी होणार आहे. त्यामुळे कुणीही घाबरण्याचे कारण नाही. उलट लोकांनी सहकार्य करून गोव्याच्या सुरक्षेसाठी मदत करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आयुष गोवा कोविड 19 ऍपचा शुभारंभ
कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुष गोवा कोविड 19 हे ऍप तयार केले आहे. त्याचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या आल्तीनो येथील निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक व डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आले. योगक्रियेद्वारे शरीरातील प्रतिकार शक्ती कशी वाढवावी, कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, राहणीमान कसे असावे याची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टीने हे ऍप अत्यंत महत्त्वाचे आहे. हे ऍप डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आयुर्वेदीक उपचार व आरोग्य खात्याकडून केले जाणारे उपचार यातून हा लढा पुढे नेला जाणार आहे. आयुष मंत्रालयाच्या ऍपचा यासाठी मोठा फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले.
एक रुग्ण बरा झाल्याने आनंद वाटला
गोव्यातील 7 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी एक रुग्ण बरा झाला आहे. त्याला इस्पितळातून डिस्चार्जही दिला आहे. एक रुग्ण बरा झाल्याने आनंद वाटला. याबद्दल आपण डॉक्टरांचे व आरोग्य कर्मचाऱयांचे अभिनंदन केले. गोवा तुमच्या बरोबर आहे. हा विश्वासही त्यांना दिला. उर्वरित सर्व रुग्ण ठिक होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 3 एप्रिलला शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. आतापर्यंत सर्व चाचण्या नकारात्मक आल्याचे ते म्हणाले.
मास्क, सेनिटायझर उपलब्ध
राज्यात मास्क मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. स्वयंसाहाय्य गटानाही मास्क तयार करण्याची सूचना केली आहे. अजून अनेक दिवस मास्क वापरावे लागणार आहेत. आता घरातही कपडा आणून मास्क तयार केले तरी हरकत नाही. सेनिटायझरही राज्यात मोठय़ा प्रमाणात तयार केले आहे. सुमारे 70 हजार लिटर सेनिटायझर तयार केले आहे. 20 हजार लिटर सरकारला दिले आहे तर उर्वरीत सेनिटायझरची विक्री केली आहे.
पावसाळापूर्व कामे सुरू
राज्यात 164 पंचायतींनी पावसाळापूर्व कामे सुरू केली आहेत. पालिकांनीही कामे सुरू केली आहेत. अगोदर ही कामे जिल्हाधिकाऱयांमार्फत केली जायची पण यावेळी साबांखा, वनखाते तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यामार्फत केली आहेत. राष्ट्रीय महामार्गालगतचे काम व झाडेझुडपे साफसफाई केली जाणार आहे.
बोटीवरील गोमंतकीयांना मुंबईत ठेवणार
विदेशातून काल गोव्याच्या समुद्रात दाखल झालेल्या जहाजात 100 प्रवासी गोमंतकीय होते. त्यांना गोव्यात उतरविण्यात आले नाही. त्यांना मुंबईत उतरविण्यात येणार आहेत व 14 दिवस त्यांना मुंबईतील विलगीकरण व्यवस्थेत ठेवले जाणार आहे. त्यानंतर चाचणी करून त्यांना गोव्यात आणले जाईल व गोव्यातही विलगीकरण विभागात ठेवले जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विदेशात असलेल्या प्रवाशांना घेऊन जहाज गोव्यात दाखल होताच याबाबत मोठी चर्चा सुरू झाली. एकूण या जहाजात 500 प्रवासी होते.
खर्च कपातीसाठी आर्थिक आढावा समिती
गोवा राज्य सध्या कठीण परिस्थितीतून जात असल्याने सरकारने खर्चात कापण्याचा निर्णय घेतला त्यासाठी आर्थिक आढावा समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीची घोषणा आज 10 एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यसचिव व वित्तसचिव यांचा या समितीत सहभाग आहे. तसेच खासगी क्षेत्रातील 7 ते 8 लोकांची मदत घेतली जाणार आहे. पुढील वर्षभरात कशाप्रकारे खर्च कपात करावी यावर ही समिती निर्णय घेणार आहे.
राज्यातील सर्वच लोकांकडून यासाठी सूचना मागविण्यात येणार आहे. ज्या कुणाला सूचना करायच्या असतील त्यांनी सूचना कराव्यात पुढील वर्षभर सरकार आर्थिक स्थितीचा अहवाल घेत राहणार आहे. राज्यातील खर्च कपात यानंतर करावी लागणार आहे. पुढील वर्षभर खर्च कपात कशी करावी याचा आढावा घेतला जाणार आहे.
प्राथमिक शिक्षकांनी दिला 1 दिवसाचा पगार
राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी कोरोनासाठी स्वच्छेने आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री कोविड निधीसाठी दिला आहे. कुणावरही सक्ती केली नाही. प्रत्येक शिक्षकाने स्वेच्छेने एक दिवसाचा पगार दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.