सर्दी, खोकला, ताप साथीचे रुग्ण वाढले : डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण अत्यल्प : लसीकरणाच्या सुपरिणामाने कोरोना नियमावलीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाची तिसरी लाट असल्याची भीती व ओमिक्रॉनचे वाढते रुग्ण, यातच सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने आढळून येत असल्याने आरोग्य खात्याला चिंतेने ग्रासले आहे. अनेकजण रुग्णालयाला न जाता घरीच स्वतःच औषधे आणून उपचार घेत आहेत. त्यामुळे आवश्यक औषधांची मागणीही वाढली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हय़ातही सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी असे रुग्ण वाढले आहेत. सरकारी दवाखान्याला गेल्यास कोरोना चाचणीच्या भीतीने अनेकजण खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. हवामान बदलामुळे असे रुग्ण वाढल्याचे सांगून अनेक खासगी डॉक्टरही आपल्या पातळीवर उपचार करत आहेत. अशा प्रकारच्या रुग्णांना ही साथ साधारण 15 दिवसांपर्यंत राहत आहे. हवामान बदलामुळे अशा रुग्णांची संख्या वाढली असली तरी कोरोनाची लक्षणेही अशीच असल्याने रुग्णांचीही चिंता वाढली आहे. तरीही ग्रामीण भागात अनेक रुग्ण काळजी न करता सर्रास मोकळेपणाने फिरत असल्याने रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोना संपला या थाटात लोकांनी मास्कही वापरण्याचे बंद केले आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी केली नसली तरी सामान्य आजाराचे रुग्ण ग्रामीण भागातही अधिक आहेत.
सामान्य आजारातून 63 लाख बाधित
राज्यात ताप आलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी केली असता त्यातील अधिकतर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पहिल्या लाटेनंतर रुग्ण वाढत असल्याने आरोग्य खात्याने घरोघरी जाऊन ताप, सर्दी, खोकला असलेल्यांची चाचणी केली होती. त्यातून आतापर्यंत 63 लाख 85 हजार लोक बाधित आढळले होते. 1 लाखावर लोक सामान्य आजारी होते. यापैकी बहुतांश रुग्ण रुग्णालयातच गेलेले नाहीत. गेल्या दोन वर्षांची स्थिती पाहिल्यास उन्हाळय़ापूर्वी अशा रुग्णांची संख्या वाढल्याचे राज्यातील आकडेवारी सांगते.
औषधांची मागणी वाढली
ताप, सर्दी, खोकला असे रुग्ण अधिक असले तरी बहुतांश जण स्वतःच मेडिकलमधून औषधे घेत आहेत. डोलो-650, पॅरासिटामॉल यासह अनेक औषधे स्वतःच घेण्याचा कल वाढला आहे. डॉक्टरांकडे न जाता स्वतःच उपचार करून घेत आहेत. सामान्यपणे घरगुती उपचारांवर त्यांचा भर आहे. वरील काही औषधांची मागणी सामान्यांपेक्षा चार पटीने वाढल्याचे मेडिकल्समधून समजून येत आहे.
आरोग्य खात्यासमोर आव्हान
सध्या एका रुग्णापाठोपाठ आठ ते दहा रुग्ण संपर्कात आल्याने त्यांनाही हीच लक्षणे आहेत. अनेक घरांमध्ये सर्वजण अशा आजाराचे असले तरी कोरोना चाचणीच होत नसल्याने आरोग्य खात्यासमोर संसर्ग नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना चाचणी वाढली असली तरी बहुतांश रुग्णांना दवाखान्यात दाखल करावे लागत नसल्याने व लसीकरणाचा चांगला परिणाम दिसल्याने लोकही कोरोना नियमावलीकडे दुर्लक्ष करत आहेत. सर्दी, ताप, खोकला या बरोबरच साथीचेही रुग्ण आढळून येत आहेत. काही जणांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असला तरी धोकादायक उपचार घेत आहेत.
काय करायला हवे?
- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने स्वतः डॉक्टर होऊन औषधे घेण्यापेक्षा डॉक्टरांकडून योग्य उपचार व औषधे घ्यावीत.
- सामान्य रुग्ण असले तरी काही दिवस घरीच राहावे, यामुळे आपल्यापासून दुसऱयाला कोणताही त्रास होणार नाही.
- अगदीच आवश्यकतेनुसार बाहेर जावे लागल्यास अशांनी मास्क वापरून सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक.
- बाहेरील चमचमीत पदार्थांचे सेवन करू नये, गरम जेवण करून विश्रांती घेण्यावर भर द्यायला हवा.
- गरम पाणी पिणे चांगले, अंगावर उबदार कपडे परिधान करून काही दिवस घरीच राहावे.
- औषधांनी चार दिवसात आजार कमी होत असल्याने काही दिवस घरी राहून आरोग्याची काळजी घ्यावी.
- घरी राहणाऱयांनीही असे रोग संसर्गजन्य असल्याने घरातील मंडळींपासून शक्मयतो दूर राहावे.
- श्वासोच्छवासाचा त्रास जाणवल्यास व ताप 99 पेक्षा अधिक असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- घरासह आसपास स्वच्छता राखावी. कुठेही पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
- संसर्गजन्य रोगामुळे लहान मुलांनाही आपल्यापासून बाजूला ठेवावे. घरीच आयसोलेट होणे अतिशय चांगले.
सामान्य रुग्ण का वाढले?
- सामान्यपणे डिसेंबरमध्ये असणारे बदलते हवामान यावषी जानेवारीतही कायम आहे.
- दिवाळीनंतर हवामान बदलामुळे राज्यात सामान्यपणे असे रुग्ण आढळून येत असतात.
- दिवाळीनंतरही पाऊस झाल्याने सामान्यपणे यावेळी संक्रांतीनंतरही हवामान बदल सुरूच आहे.
- दमट हवामानामुळे ताप येऊन त्यातून सर्दी, खोकला, कफ असे रुग्ण सर्व जिल्हय़ात आहेत.
- हवेत बदल होत असल्याने जुने रुग्ण असलेल्यांना श्वासोच्छवास व हृदयाचे रोग डोके वर काढत आहेत.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने सामान्य रुग्णही वाढत आहेत.
- काही भागात चिकुनगुनिया व डेंग्युचे रुग्णही अधिक संख्येने आढळून येत आहेत.
- पाऊस थांबल्यानंतर राज्यातील विविध भागातील आजारी लोकांची संख्या वाढत गेली.
दृष्टिक्षेपात…
- राज्यात सामान्य विविध आजारांचे रुग्ण वाढले
- कोरोना चाचणीच्या भीतीने खासगीत उपचारावर भर
- किट घेऊन घरांमध्येच स्वतःच कोविड चाचणी प्रमाणात वाढ
- लक्षणे असली तरी आजार लपविण्याचे प्रकार
- लहान मुलांत संसर्ग वाढत असले तरी उपचाराकडे दुर्लक्ष
- मृत्यू कमी व दवाखान्यात जाण्याचे प्रमाण कमी असल्याने लोक बेफिकीर