कोरोना विषाणूने चीनमध्ये थैमान मांडून जगभरातील तब्बल 80 हून अधिक देशात शिरकाव केल्यानंतर या भयंकर विषाणूने आता शेजारील भारताला गाठले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या भारतात तीसवर पोहोचल्याने सरकारने ही धोक्याची घंटा मानली आहे. दिल्लीतील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतील एका शाळेतील विद्यार्थ्याच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. येथील विविध कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. देशातल्या 21 विमानतळांवर परदेशातून येणाऱया प्रवाशांची शारीरिक तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत दहा लाखांहून अधिक प्रवाशांची चाचणी घेतली असून नेपाळ, भूतान, म्यानमार यासारख्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून येणाऱया दहा लाख नागरिकांनाही तपासले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची सावली मोठी होत चालली असून त्याचे दुष्परिणाम सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत. सन 1930 मध्ये जागतिक मंदी आली होती. याची आठवण करून देणारी मोठी मंदी 2007 आणि 2008 ला आली होती. मॉरगेज कंपन्यांनी कमी व्याजदरात भरमसाठ कर्जपुरवठा केल्यामुळे प्रथम अमेरिकेत ही मंदी आली. त्याची लाट नंतर जगभरात पसरली. मुख्यतः लेहमन ब्रदर्स ही मोठी वित्तसंस्था दिवाळखोरीत गेल्यामुळे ही मंदी आली होती. परंतु एखादा विषाणू मानवी शरीर पोखरतो, जनजीवन उद्ध्वस्त करतो. त्याचप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्था पोखरून आर्थिक मंदीची परिस्थिती कशी उभी करतो यासाठी कोरोना प्रकरणाकडे पहावे लागेल. उदाहरण द्यायचे झाल्यास कोरोना दहशतीमुळे जगभरातील हवाई वाहतूक कंपन्यांना आतापर्यंत 113 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. भारतीय बाजारपेठेवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. मुळातच भारतीय अर्थव्यवस्था अलीकडच्या काळात अत्यंत बिकट मार्गातून वाटचाल करीत असताना कोरोना विषाणू हल्ल्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्था, उद्योग, शेअर व चलन बाजारावर दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. वास्तविक देशातील उत्पादन व विक्रीवर त्याचा परिणाम जाणवत नाही. उलट गेल्या दोन महिन्यात त्याचा आलेख उंचावला आहे. परंतु चीनमधून येणारे सुटे भाग व कच्चा माल पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी इलेक्ट्रॉनिक, औषधे आणि वाहन उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील वाहन उद्योग बीएस-4 मानकांची उत्पादने बंद करीत असून प्रदूषणाचे नवीन निकष असणार बीएस-6 वाहने उत्पादन करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी वाहनांच्या सुटय़ा भागाच्या अपुऱया पुरवठय़ामुळे वाहन उत्पादन कमी करावे लागत आहे. 27 टक्के सुटे भाग चीनमधून आयात केले जातात. कोरोना विषाणू संशयितांचे प्रमाण वाढल्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसात अचानकपणे भीतीची लाट निर्माण झाली. अमेरिकेसारख्या देशात जिथे स्वच्छतेची व आरोग्याची पराकोटीची काळजी घेतली जाते, तेथे आतापर्यंत या रोगामुळे 12 बळी गेले. भारतासारख्या 135 कोटींच्या विशाल देशात जिथे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत प्रचंड अनास्था आहे, तिथे कशी परिस्थिती उद्भवेल ही चिंता करणारी बाब आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र व प्रत्येक राज्यांच्या सरकारने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला जात आहे.वास्तविक या काळात प्रत्येकाने सावधानता बाळगून चुकीची माहिती प्रसारित होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा संकटाच्या वेळी परस्पर सहकार्य करून सामुदायिकपणे लढा द्यावा लागतो. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. तीस व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून दिल्लीत पसरल्यानंतर बाजारपेठेत अचानकपणे मास्क व सॅनेटायझरची मागणी दसपटीने वाढली. काही काळानंतर मास्क आणि हात निर्जंतूक करणाऱया लिक्विड सोपचाही तुटवडा जाणवू लागला. एरव्ही दहा रु.ला मिळणारा मास्क पन्नास रु.ना विकला जाऊ लागला. विषाणूंचा प्रभावीपणे अटकाव करण्यासाठी तज्ञांकडून एन 95 मास्कची शिफारस केली जाते. याची किंमत 150 रु. आहे. पण संधीचा फायदा उठवण्यासाठी त्याची पाचशे-सहाशे रु.ला विक्री होऊ लागली आहे. एमआरपी पेक्षा चौपट पाचपटीने विक्री म्हणजे लोकांच्या भीतीचा व्यावसायिक फायदा उठविण्याचा हा निंदनीय प्रकार म्हणावा लागेल. सरकारने अशावेळी अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. बाजारपेठेत एखाद्या वस्तूची अचानक मागणी वाढते, त्यावेळी टंचाई निर्माण होते. ग्राहकांच्या मनातील भीती, वस्तूंची वाढती मागणी याचा फायदा उठवण्यासाठी साठेबाजीला प्रोत्साहन मिळते. वास्तविक या काळात परस्पर सहकार्य अपेक्षित असून ग्राहकांना दिलासा देण्याची गरज असते. पण या ठिकाणी उलट घडताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली असताना दुर्दैवाने इकडे नेत्यांमध्ये राजकीय स्टंटगिरी सुरू आहे. गांभीर्य नसल्याचे हे लक्षण आहे. कोरोना संसर्गाचा इटलीचा संदर्भ येताच राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी लोकसभेला एक ‘मोलाचा’ सल्ला दिला. कोरोना व्हायरसची लागण गांधी फॅमिलीतून झाली आहे काय असा सवाल करुन प्रथम गांधी फॅमिलीची टेस्ट करा, अशी सूचना त्यांनी केली. कोरोना विषाणूची लागण नियंत्रणात असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन करीत आहेत. यावर अत्यंत बालिश टिपणी राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले की, हर्षवर्धन यांचा दावा म्हणजे प्रवाशांनी अजिबात घाबरू नये. कारण आपले जहाज बुडणारे नाही, असा दावा करणाऱया टायटॅनिकच्या कॅप्टनसारखे आहे. वास्तविक कोरोना विषाणूमुळे आपल्या सर्व व्यवस्थेला आव्हान मिळाले आहे. या काळात देशातील सर्वच नेत्यांनी सामुदायिक शहाणपण दाखवून एकत्र येऊन या संकटाच्या विरोधात लढा देण्याची गरज असताना अशा गंभीर परिस्थितीत या नेत्यांना असली बुद्धी कशी सुचते तेच समजत नाही. राजकीय द्वेष आणि मत्सर इतका पराकोटीचा नसावा. ते कमकुवत मनाचे व राजकीय अपरिपक्वतेचे हे लक्षण आहे.
Trending
- मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा
- ही स्वाभिमानाची लढाई ! बाजीराव खाडेंचं बंड…उमेदवारी अर्ज भरताना अश्रू अनावर
- रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात !
- नारायण राणे थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज !
- जिल्हा परिषदेच्या लेखाधिकाऱ्याचे अपहरण करुन मारहाण ! कनिष्ठ लिपिकासह ८ जणांना अटक
- विजय सरदेसाई हे ‘कटाप्पा’
- 99 टक्के कामे पाच वर्षांत होणार पूर्ण
- आरजीपीचे रूबर्ट, मनोज यांचे अर्ज सादर