कृषीमंत्री बाबू कवळेकर यांची माहिती, राज्यातील 172 शेतकऱयांना लाभ
प्रतिनिधी/ पणजी
सामुदायिक शेतीच्या (कम्युनिटी फार्मिंग) 10 प्रस्तावांना शेती खात्याने मान्यता दिली असून त्यावर रु. 1.41 कोटी खर्च करण्यात येणार आहे. त्यात रु. 1.06 कोटी अनुदानाचा समावेश असून सुमारे 172 शेतकऱयांना त्याचा फायदा होणार आहे. या शेती अंतर्गत 76.46 हेक्टर्स जमीन (7.64 लाख चौ.मी) लागवडीखाली येणार असून त्यात विविध पिके, भाजीपाला यांचा अंतर्भाव आहे.
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.
ते म्हणाले की, गेल्या वर्षी फक्त 3 प्रस्ताव आले होते. यंदा खात्याच्या कार्यक्षमतेमुळे 10 प्रस्ताव आले असून ते मंजूर करण्यात आले आहेत. 10 वेगवेगळे गट शेतकऱयांनी केले असून त्यांना सर्व ती मदत शेती खाते करणार आहे. सत्तरी – 2, बार्देश – 1, काणकोण – 3, केपे – 1, तिसवाडी – 1, पेडणे – 1, डिचोली – 1 असे ते गट असून त्यात एकूण 172 शेतकरी समाविष्ट आहेत, असे त्यांनी नमूद केले.
सामुदायिक शेती प्रोत्साहनासाठी सरकार प्रयत्नशील
एकटा शेतकरी जमीन आहे तरी काही करु शकत नाही. अशावेळी अनेक शेतकऱयांना एकत्र आणून त्यांचा गट करुन सामूदायिक शेतीचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सामुदायिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
शेतकऱयांना मिळणार तब्बल 90 टक्के अनुदान
सामुदायिक शेतीच्या या उपक्रमात 90 टक्के अनुदान देण्यात येणार असून फक्त 10 टक्के खर्च शेतकऱयांनी करायचा आहे. कुंपण, वीड कटर, पॉवर टिलर, पंप, पाईपलाईन, टॅक्टर्स, विहीर, खते याची उपलब्धता खाते करुन देणार असल्याचा दावा कवळेकर यांनी केला.
अनेक फळांची कलमे लावण्याची योजना शेती खात्याने आखली असून ती कलमे लावल्यानंतर त्याची देखरेख करण्यासाठी रु. 300 प्रति कलम देण्यात येणार आहे. 3 वर्षे तरी ही रक्कम मिळणार असल्याची माहिती कवळेकर यांनी दिली. गेली काही वर्षे सरकार सामुदायिक शेतीसाठी प्रयत्न करत होते, मात्र यश मिळत नव्हते. यावर्षी खात्याने यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे या दहा प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे.