तरीही बेळगावकर शांतच राहणार का? या वृत्तावर नागरिकांनी दिल्या प्रतिक्रिया : तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
तरीही बेळगावकर शांतच राहणार का? या तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या विशेष वृत्ताची वाचकांनी उत्स्फूर्त दखल घेतली व हा विषय मांडल्याबद्दल तरुण भारतचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी सामूहिक लढय़ातूनच बेळगावचे प्रश्न सुटतील, असे मतही व्यक्त केले आहे.
या वृत्तावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बेळगावच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याबद्दल प्रशासनाला जाब विचारणे आवश्यक आहे. असे अनेकांना वाटते. या प्रश्नांना वाचा फोडणे ही काळाची गरज होती, असे मत चार्टर्ड अकौंटंट सतीश मेहता यांनी व्यक्त केले आहेत. तर ज्यांच्या उरातील वेदना आजही ठसठसत आहेत. ते चार्टर्ड अकौंटंट मनोज हुईलगोळ यांनी हे सर्व खरे आहे. पण उपयोग काय? आणि कोण काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या प्रमोदा हजारे यांनी आता पत्रकारांची लेखणीच बदल घडवू शकेल, असे मत व्यक्त केले आहे. प्रतिभा दडकर व संध्या शानभाग यांनी सहनशील बेळगावकरांचा प्रशासन अंत पाहते आहे, असे म्हणणे आहे. जर आपण आता हक्कासाठी उभे राहिलो नाही तर आपण आपले हक्क गमावून बसू, असे उद्योजक राजेश हेडा यांनी म्हटले आहे. इथे सुद्धा खळ्ळ खट्टय़ाक करणारेच पाहिजेत, असे मिलिंद बापट यांनी म्हटले आहे.
आरती आपटे यांनी कोठे तक्रार केली तर दखल घेतली जाते. व कोणत्या विभागाशी संपर्क साधावा याबद्दल माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बेळगावच्या समस्यांवर योग्य प्रकाशझोत टाकण्यात आला आहे, असे लता कित्तूर यांनी कळविले आहे. श्रीधर कुलकर्णी यांनी वाहन कसे चालवावे याची माहिती करून घेऊनच वाहन हाती धरावे, असे म्हटले आहे. नागरी प्रश्नांसाठी माजी नगरसेवक संघटना सतत आवाज उठवत आहे. लवकरच नागरिकांच्या हक्कांसाठी संघटना लढा देणार आहे, असे ऍड. नागेश सातेरी यांनी म्हटले आहे.
फोन केला तरी उद्धट व बेजबाबदार उत्तरे मिळतात, असे अक्षय आपटे यांनी नमूद केले. शहराला जाग कोण आणणार, असा प्रश्न शिवाजी किल्लेकर यांनी केला आहे. कितीही तक्रार केली तरी उपयोग शून्य आहे. आम्ही कंटाळलो आहोत, असे प्रभा कुलकर्णी व किशोर काकडे यांनी म्हटले आहे. हे शहर रामभरोसे चालले आहे. नागरिक सुद्धा नियम मोडण्यात मोठेपणाच मानतात, असे रोहिणी गणफुले म्हणतात. बेळगावचेच असलेले पण पुण्यात राहणाऱया वर्षा अरविंद नातू यांनी सुद्धा सर्वच शहरांची ही परिस्थिती आहे, असे सांगितले.
याच स्वरुपाच्या प्रतिक्रिया अनेकजणांनी व्यक्त केल्या आहेत. व तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. हेच या विशेष वृत्ताचे फलित होय.
प्रशासनाला जाब विचारण्याची गरज
या प्रश्नांना वाच फोडण्याची नितांत गरज होती. मात्र त्यातून आता सर्वांनी एकत्र येवून प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे. अन्य राज्यांमध्ये व शहरांमध्ये सरकारच सार्वजनिक तक्रार निवारण समिती स्थापन करते. तेथे कोणीही येवून तक्रार करू शकते. त्या तक्रारींची वेळीच दखल घेतली जाते. त्यामुळे अशा प्रकारची समिती बेळगावमध्ये स्थापन्याची गरज आहे. असे सीटीझन्स कौन्सिलचे सतीश तेंडोलकर यांनी म्हटले आहे.
प्रशासनाला जाब विचारण्याची गरज
या प्रश्नांना वाचा फोडण्याची नितांत गरज होती. मात्र त्यातून आता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे. अन्य राज्यांमध्ये व शहरांमध्ये सरकारच सार्वजनिक तक्रार निवारण समिती स्थापन करते. तेथे कोणीही तक्रार करू शकते. त्या तक्रारींची वेळीच दखल घेतली जाते. त्यामुळे अशा प्रकारची समिती बेळगावमध्ये स्थापन्याची गरज आहे. असे सीटीझन्स कौन्सिलचे सतीश तेंडोलकर यांनी म्हटले आहे.