पिंपरी ते गेट वे ऑफ इंडियाचा टप्पा केला पूर्ण
पिंपरी / प्रतिनिधी :
सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, हा संदेश देण्यासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील बारा तरुणांनी निगडी ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाचा 143 किलोमीटरचा टप्पा गाठला. या सायकल रॅलीसाठी तरुणांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाची निवड केली. घाटमार्ग असलेला हा रस्ता तरुणांनी एका रात्रीमध्ये पूर्ण केला.
पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील काही तरूणांनी एकत्र येत पर्यावरण रक्षणासाठी सायकल मोहिम करण्याचे नियोजन केले. जमेल तेव्हा आणि जमेल तसे सायकल रॅली करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी सायकल मित्र परिवाराची स्थापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सुहास गदादे, अजित झेंडे, संतोष धुमाळ, सुभाष वाजे, सुर्यकांत पाटील, लक्ष्मण सुतार या तरुणांनी पाच जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून रॅलीला सुरुवात केली. 6 जानेवारी रोजी पहाटे या तरुणांनी निगडी ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाचा 143 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला. यामध्ये बारा तरुणांचा सहभाग होता. हे तरूण विविध कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत.
लक्ष्मण सुतार म्हणाला, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश तर द्यायचा होताच, पण लोकांना नुसताच विचार करायला न लावता सामूहिक जबाबदारीची जाणीवही करून द्यायची होती.
संतोष धुमाळ म्हणाला, धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शारिरीक व मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम व पोषक आहार अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे आवश्यक तेथे सायकल वापरण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे.