महाराष्ट्राच्या मालविकाकडून सायनाचा पराभव, किदाम्बी श्रीकांतसह सात बाधित खेळाडूंची माघार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
येथे सुरु असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील दुसऱयाच फेरीत भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधू, सायना नेहवाल यांना पराभवाचा धक्का बसला. तसेच या स्पर्धेदरम्यान किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पासह सात खेळाडू कोरोना बाधित आढळल्याची माहिती जागतिक बॅडमिंटन महासंघाने दिल्यानंतर एकच खळबळ
उडाली.
गुरुवारी झालेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात अव्वलमानांकित सिंधूने आपली विजयी आगेकूच कायम राखताना मायदेशी सहकारी इरा शर्माला 21-10, 21-10 असे नमवले. आता, तिची पुढील लढत अश्मिता चालिहाशी होईल. तत्पूर्वी अश्मिताने फ्रान्सच्या येले होवेक्सला 21-17, 21-14 असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
नागपूरच्या मालविकाकडून सायनाचा धक्कादायक पराभव
माजी अग्रमानांकित सायना नेहवालला मात्र या स्पर्धेत दुसऱयाच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱया सायनाला मात्र चमक दाखवता आली नाही. जागतिक क्रमवारीत 111 व्या स्थानी असलेल्या मालविका बनसोडने सायना नेहवालला 21-17, 21-9 असे पराभूत करत धक्कादायक निकालाची नोंद केली. या विजयासह तिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मालविकाची पुढील लढत आकर्षी कश्यपशी होईल. आकर्षीने दुसऱया फेरीच्या लढतीत कायरा मोपटनवर 21-10, 21-10 असा विजय मिळवला.
पुरुषांच्या लढतीत एचएस प्रणॉयला पुढील फेरीत प्रवेश मिळाला. त्याचा प्रतिस्पर्धी मिथुन मंजुनाथ कोरोनाबाधित आढळल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली. समीर वर्माने दुखापतीमुळे माघार घेतल्याने प्रतिस्पर्धी कॅनडाच्या ब्रेन यांगला पुढे चाल मिळाली.
किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पासह सात खेळाडू कोरोना बाधित
या स्पर्धेदरम्यान भारताचे 7 खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. या 7 खेळाडूंमध्ये स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि दोनवेळची राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अश्विनी पोनप्पा यांचाही समावेश आहे. त्यामुळे या दोघांनी तसेच त्यांचे दुहेरीतील साथीदार यांना इंडिया ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. याबद्दल जागतिक बॅडमिंटन महासंघाने माहिती दिली आहे.
तसेच श्रीकांत आणि पोनप्पा या दोघांव्यतिरिक्त रितिका राहुल ठक्कर, त्रिशा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमन सिंघी आणि खुशी गुप्ता यांचा देखील कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. यातील पोनप्पा, ठक्कर, त्रिशा, खुशी आणि सिमरन हे दुहेरीत खेळत असल्याने त्यांच्या साथीदारांनाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे स्पर्धेतून माघार घेणाऱया भारतीय खेळाडूंची संख्या 12 झाली
आहे.