वृत्तसंस्था/ लखनऊ
संगणकीय गफलती करून लोकांच्या खात्यातील पैसे चोरण्याचे प्रकार अलीकडच्या काळात बरेच वाढले असल्याने सर्व राज्यांमध्ये सायबर सेल जागृत झाला आहे. उत्तरप्रदेशमध्ये अशा प्रकारे फसवणूक करून लुबाडलेले सात कोटी रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यापैकी दोन कोटी रुपये मूळ खातेदारांना परत करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
परत मिळविलेल्या सात कोटी रुपयांपैकी पाच कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. या रकमेचे मूळ मालक मिळत नसल्याने किंवा स्थिती संशयास्पद असल्याने ही रक्कम गोठविण्यात आली असून ही रक्कम मूळ मालक मिळाल्यानंतर ती त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात येईल. उत्तर प्रदेश सरकारने सायबर गुन्हय़ाबाबत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. तसेच पोलिसांनाही सायबर गुन्हे शोधून काढण्याच्या संदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्यभरात असे विशेष प्रशिक्षिक किमान 2000 पोलीस तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सायबर गुन्हे शोधण्यासाठी मोबाईल आणि कॉम्प्युटरचा उपयोग कसा करावा याचे प्रशिक्षण देण्यात येत असून लोकांना निष्काळजीपणापासून दूर ठेवण्यासाठी सातत्याने सायबर गुन्हे कसे घडतात याची माहिती देण्यात येत आहे.