जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानातील अरावली पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणाऱया सारिस्का या जगप्रसिद्ध अभयारण्याला सध्या आगीच्या ज्वाळांनी वेढले आहे. गेल्या आठवडय़ात लागलेला हा वणवा आता बऱयाच भागात पसरलेला आहे. ही आग विझविण्याचे प्रयत्न राजस्थान सरकारच्या अग्निशमन विभागाकडून होत आहेत.
या अभयारण्यात 27 वाघांचे वास्तव्य असल्याने त्यांच्या सुरक्षेसंबंधी वनाधिकाऱयांना चिंता वाटत आहे. याशिवाय दुर्मिळ अशा वनस्पती, नीलगाय आणि बिबटय़ांचाही हा अधिवास आहे. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे असून या प्राणी आणि पक्षी प्रजातींपैकी काही नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने या भीषण आगीतून त्यांना वाचविण्याचे जटील आव्हान राज्य सरकारसमोर आहे. गेले तीन दिवस युद्ध पातळीवर ही आग विझविण्याचे प्रयत्न होत असूनही अत्यल्प यश पदरी पडले आहे. अनेक स्थानी एकाच वेळी वणवा भडकल्याने अग्निशमन विभागाची तारांबळ उडली आहे. अन्य राज्यांमधूनही साहाय्य मागविण्यात आले असून केंद्र सरकारनेही आपली सहाय्यता पथके पाठविली आहेत. सध्या या भागात उष्णतेची अतितीव्र लाट आली असून त्यामुळे वातावरण शुष्क बनले आहे. आग पसरण्यासाठी ही स्थिती अनुकूल असल्याने आणि वारेही वाहत असल्याने आग विझविण्याचे कार्यात अडथळे येत आहेत.