वार्ताहर / खडकलाट
सर्व समाजातील नागरिक एकत्र येऊन एक सण साजरा करावा यादृष्टीने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हेच सण सर्व धर्मातील लोक मोठय़ा उत्साहात साजरा करतात. पण गेल्या दोन वर्षांपासून या सणावर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले. यावषीही सदर सण बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पण यामुळे अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागणार असून निपाणीच्या तहसीलदारांनी यावषी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भोज जि. पं. सदस्य आणि बेळगाव जिल्हा वडर समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वडर-पवार यांनी केली आहे.
राजेंद्र वडर-पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात, गणेशचतुर्थी हा सण मोठा आणि सर्वांचा लाडका सण आहे. या सणासाठी कुंभार समाजाकडून सहा महिन्यांपासूनच तयारी करण्यात येत असते. याशिवाय सजावट करणारे, साहित्य तयार करणारे, त्याची विक्री करणारे, वाजंत्रीवाले, मंडप डेकोरेशनवाले असे अनेक नागरिक या सणावर अवलंबून आहेत. गेल्या वषीच्या तुलनेत यावषी कोरोनाचे प्रमाण या भागात कमी असून याचा विचार करून तहसीलदार यांनी गणेश चतुर्थीला अटी घालून परवानगी दिल्यास अनेकांचे संसार चालणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाला परवानगी द्यावी, असे नमूद केले आहे. फक्त गणेश चतुर्थी सण साजरा केल्यास कोरोना होतो हे कितपत योग्य आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र शासनाकडून लॉकडाऊन करून सर्व बंद केले असले तरी राजकीय कार्यक्रम, मिरवणूक आणि निवडणुकीवर मात्र बंदी का नाही. निपाणी शहरात मंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत कोरोना होत नाही का?, सध्या प्रत्येक गावात राजकीय कार्यक्रम, सत्कार सुरू असून यासाठीही मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते एकत्रित येताना दिसतात. पण यावर निर्बंध घातले जात नाहीत. मग फक्त गणेश चतुर्थी सण साजरा केल्यास कोरोना होतो हे कितपत योग्य आहे?, असा प्रश्नही त्यांनी या निवेदनातून विचारला आहे.