मास्कही बंधनकारक : आणखी आठ रिपोर्ट निगेटिव्ह : 41 जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा
- जिल्हय़ात दारू, तंबाखू, गुटखा विक्रीवर बंदी
- अत्यावश्यक सेवांकरीता दिलेल्या पासना मुदतवाढ
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हय़ात कोरोना नमुना तपासणी अहवालामध्ये आठजणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 41 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दिली.
तसेच जिल्हय़ात संचारबंदीचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविण्यात आला असून अत्यावश्यक सेवेसाठी 15 एप्रिलपर्यंत देण्यात आलेल्या ई पासची मुदत 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 117 अन्वये एक हजार रुपये इतका दंड केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या आदेशांचे तंतोतंत पालन करावे. तसेच दारू, तंबाखू, गुटखा यांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी वावरताना सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.
जिल्हा रुग्णालयातर्फे पाठविण्यात आलेल्या आणखी आठ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजपर्यंत एकूण 132 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 91 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. 41 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आणखी 16 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमध्ये आता एकूण 64 व्यक्ती दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात सद्यस्थितीत 418 व्यक्ती विलगीकरणात असून त्यापैकी 378 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. संस्थात्मक अलगीकरणामध्ये 40 व्यक्ती असून 28 दिवसांचे अलगीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 183 आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत बुधवारी 2246 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
अत्यावश्यक सेवेकरिता दिलेल्या पासांना मुदतवाढ
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर 3 मे 2020 रोजीपर्यंत लॉकडॉऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच जिल्हय़ाच्या भूभागांमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हय़ात अत्यावश्यक सेवांसाठी ये-जा करणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना पोलीस विभागामार्फत ई-पास देण्यात आले आहेत. या ई-पासची मुदत 15 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे या सर्व ई-पासना 3 मे 2020 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
घरीच अलगीकरण 0378
संस्थात्मक अलगीकरण 0040
पाठविण्यात आलेले नमुने 0132
अहवाल प्राप्त नमुने 0091
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0090
अहवाल प्राप्तीची प्रतीक्षा 0041
विलगीकरण कक्षात दाखल 0064
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
बुधवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2246