प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना तीन पदरी मास्क किंवा साधा कापड़ी मास्क किंवा रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक केले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी रात्री दिले.
राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्चपासून लागू केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना, रस्ते, वाहने, दवाखाने, कार्यालये, बाजार आदी ठिकाणी, तीन पदरी मास्क किंवा साधा कापड़ी मास्क किंवा रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी मास्क औषध दुकानात मिळणारे, घरी तयार केलेले कापडाचे, रुमालाचे धुण्यायोग्य असावेत, तसेच त्याचा पुनर्वापर करताना स्वच्छ धुऊन, निर्जंतुकिकरण करुन वापरावेत, असे मास्क प्रत्येकाचे स्वतंत्र असावेत, एकमेकांमध्ये हस्तांतरीत करु नयेत. वापर झालेले असे सर्व मास्क जाळून टाकावेत.
नागरिकानी, शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचाऱयांनी त्यांच्या कार्यालयाच्या वाहनातून कार्यक्षेत्रात, कार्यालय परिसरात प्रवास करताना, काम करताना, बैठकीवेळी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी दोन व्यक्तींनी एकत्र येताना सुरक्षित अंतर ठेवणे व मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना, अधिकारी, कर्मचाऱयांनी एकत्र येताना परस्परात वैद्यकीयदृष्टय़ा निर्धारित केलेले सामाजिक अंतरा पाळणे बंधनकारक आहे.
कोणत्याही नागरिकांस सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, धाप लागणे, थकवा येणे आदी कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यास त्यांनी त्वरीत सक्तीने वैद्याकीय तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. कोणतीही व्यक्ती कोरोना तपासणीत पॉझीटिव्ह किंवा बाधीत आढळल्यास तिच्या पुढील दोन तपासण्या निगेटिव्ह येईsपर्यंत वैद्यकीय सल्ल्याने कोरोंटाईन बंधनकारक केले आहे. कोणतीही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह किंवा बाधीत आहे, असे आढळल्यास तिने व तिच्याशी थेट किंवा अन्य पद्धतीने संबंधीत व संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी त्यांचा गेल्या महिन्याचा पूर्वेतिहास, भेटी दिलेल्या ठिकाणांची व संपर्कात आलेल्यांची, प्रवासाबाबतची माहिती शासनास देणे बंधनकारक आहे. अशा सर्वाना निर्धारित कालावधीसाठी कोरोंटाईन बंधनकारक आहे. नागरिकांनी कोरोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजनांची आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकाऱयांनी नमूद केले आहे.